घुग्घुसच्या शास्त्रीनगरमध्ये पाणीटंचाई नव्हे, ‘विष’ वाहत आहे!
नळातून जिवंत किडा निघाल्याने प्रशासनाची गंभीर निष्काळजीपणा उघड

चांदा ब्लास्ट
घुग्घुस : शहरातील शास्त्रीनगर परिसरात पुन्हा एकदा धक्कादायक आणि अत्यंत चिंताजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे स्थानिक प्रशासन आणि WCL अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आज दिनांक 20 मार्च 2026 रोजी सकाळी जिनेश्वर तल्लापेल्ली यांच्या घर क्रमांक 224 च्या नळातून जिवंत किडा (जेरी) बाहेर आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
विशेष म्हणजे, ही काही पहिलीच घटना नाही. काही दिवसांपूर्वी याच भागात नळातून सापाचे पिल्लू बाहेर आल्याची धक्कादायक घटना घडली होती. याबाबत घुग्घुस पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती तसेच WCL अधिकाऱ्यांनाही याची माहिती देण्यात आली होती. तरीदेखील परिस्थितीत कोणताही बदल दिसून आलेला नाही, जे प्रशासनाच्या गंभीर निष्काळजीपणाचे द्योतक आहे.
या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, नळातून स्वच्छ पाण्याऐवजी आता जीवघेणे जिव बाहेर येत आहेत, जे थेट लोकांच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळ करणारे आहे.
घुग्घुस नगर परिषदचे नियोजन, विकास व सांस्कृतिक सभापती रवीश विनय सिंग यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “जर WCL अधिकारी ही गंभीर समस्या दुर्लक्षित करत राहिले आणि लवकरात लवकर पाईपलाईन बदलण्याचे काम केले नाही, तर आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधासारख्या गंभीर गुन्ह्यात कारवाईसाठी पत्रव्यवहार करावा लागेल.”
तसेच त्यांनी नगर परिषदेच्या आरोग्य सभापतींनाही या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आह.
आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, घुग्घुसच्या नागरिकांना अशा भयावह आणि अस्वच्छ परिस्थितीत अजून किती काळ जगावे लागणार? प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? वेळेत योग्य पावले उचलली नाहीत, तर ही निष्काळजीपणा भविष्यात मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकते.



