२ लाखांची कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; सातबारा पूर्ण कोरा करा – खा. धानोरकर

चांदा ब्लास्ट
“महायुती सरकारने आज मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांची जादुगिरी आणि घोषणांचा पाऊस आहे. सरकारने जाहीर केलेली २ लाखांची कर्जमाफीची मर्यादा म्हणजे बळीराजाच्या दुःखावर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. मुळात आजचा शेतकरी लाखो रुपयांच्या कर्जाखाली दबलेला असताना, केवळ २ लाखांचे गाजर दाखवून सरकार आपली पाठ थोपटून घेत आहे. आमची मागणी स्पष्ट आहे- शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा करा, तरच त्याला खरा दिलासा मिळेल. ही २ लाखांची अट म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा निंदनीय प्रकार आहे.”
“विदर्भातील कापूस, सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याबाबत सरकारने पुन्हा एकदा मौन पाळले आहे. एकीकडे शेतीमालाला भाव नाही आणि दुसरीकडे तुटपुंजी कर्जमाफी देऊन सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम देण्याऐवजी केवळ ‘डिजिटल’ स्वप्ने दाखवून बेरोजगारांची क्रूर थट्टा करण्यात आली आहे. महागाईने होरपळणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांना आणि गृहिणींना दिलासा देण्याऐवजी, सरकारने केवळ कागदी योजनांचे गाजर दाखवले आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे कष्टकरी, शेतकरी आणि तरुणांचा विश्वासघात करणारा आहे.”
“चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रासह संपूर्ण विदर्भाच्या तोंडाला सरकारने पुन्हा एकदा पाने पुसली आहेत. सिंचन प्रकल्प, औद्योगिक विकास आणि स्थानिक पायाभूत सुविधांसाठी या अर्थसंकल्पात कोणतीही विशेष तरतूद करण्यात आलेली नाही. हा दिशाहीन आणि जनविरोधी अर्थसंकल्प असून, मी याचा जाहीर निषेध करते.”



