शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी नाहीच
चंद्रपूरच्या पदरी यंदाही भोपळाच, ओबीसींमध्येही निराशा : दिनेश चोखारे
चांदा ब्लास्ट
मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला २०२६-२७ चा राज्याचा अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांची जुमलेबाजी असून यात चंद्रपूर जिल्ह्यावर अन्याय झाल्याची टीका काँग्रेस नेते दिनेश दादापाटील चोखारे यांनी केली आहे.
या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली नसल्याने शेतकरी वर्गाची मोठी निराशा झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील मोठ्या लोकसंख्येचा घटक असलेल्या इतर मागासवर्गीय (OBC) समाजाच्या कल्याणासाठी कोणतीही ठोस तरतूद नसल्याने हा अर्थसंकल्प म्हणजे समाजाची शुद्ध फसवणूक असल्याचा आरोपही त्यांनी केला.
विदर्भाच्या विकासाचा वारंवार उल्लेख करणाऱ्या सरकारने या अर्थसंकल्पात चंद्रपूर जिल्ह्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे चोखारे म्हणाले. दुर्गम भागातील रस्ते, आरोग्य सेवा आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विशेष पॅकेजची अपेक्षा होती, मात्र त्याबाबत कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही.
याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील वाढते प्रदूषण आणि धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसच्या प्रश्नावरही अर्थसंकल्पात मौन पाळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा भंग झाल्याचे त्यांनी नमूद केले.



