जनतेने महाराजस्व समाधान शिबिराचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी गौडा
७ मार्च रोजी मंडळ स्तरावर शुभारंभ

चांदा ब्लास्ट
सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिलांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न त्वरीत निकाली काढण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत मार्च ते मे 2026 या कालावधीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबविण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यातील मंडळ स्तरावर होणा-या या शिबिराच्या माध्यमातून योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व जनतेने महाराजस्व शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’बाबत माहिती देतांना ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे उपस्थित होते.
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत थेट पोहचणार आहे. यासाठी उपजिल्हाधिका-यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय लाभापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी जनतेने शिबिराचा लाभ घ्यावा. तसेच आपल्या महसूल विषयक अडचणींचे त्वरीत निराकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.
अभियानाचे उद्दिष्ट : १. महसूल विभागाशी संबंधित नागरिकांच्या दैनंदिन समस्या व तक्रारींचे त्वरित निराकरण करणे. २. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील नव्या तरतुदींबाबत जनजागृती करणे. ३. महसूल सेवांमध्ये डिजिटल प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करण्यास प्रोत्साहित करणे. ४. शासनाच्या विविध सुधारित धोरणांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे.
अभियानात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवा : १. भोगवटदार वर्ग २ जमिनींची तपासणी करून पात्र प्रकरणांमध्ये वर्ग १ मध्ये रुपांतर व अद्यावत ७/१२ वितरण, २. सर्व गावांमध्ये ७/१२ वाचन करून प्रलंबित नोंदीची दुरुस्ती व अभिलेख अद्ययावत करणे, ३. पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेऊन मंजुरी आदेश वितरण, ४. तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारांची नोंदणी करून अद्यावत करण्यात आलेल्या ७/१२ वितरण, ५. तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनामुळे ७/१२ मधील इतर अधिकारातील नोंदी व शेरे तसेच नव्याने प्राप्त होणाऱ्या अर्जाविषयी फेरफार घेऊन अद्यावत ७/१२ चे वाटप, ६. शाळांमधून विद्यार्थ्यांचे अर्ज संकलित करून प्रमाणपत्रांचे वितरण, ७. पाणंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश संबंधित ग्रामपंचायतीना उपलब्ध करून देणे, ८. उर्वरित पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून लाभार्थ्यांना घरपट्टे वाटप. प्रलंबित फेरफार प्रकरणे सुनावणी करून निकाली काढणे, 9. ७/१२ उताऱ्यातील चुका दुरुस्त करण्यासाठी अर्ज स्वीकारणे, डिजिटल ७/१२ व ८ अ उतारे तात्काळ उपलब्ध करून देणे, १० लोकसेवा हक्क कायद्यानुसार उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी / अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र इत्यादी वाटप, ११. महसुल सुधारणा बाबत मार्गदर्शन, १२. इतर सेवा अंतर्गत ई-मोजणी, अग्रीस्टॅक, पीएम किसान योजना, तक्रार निवारण सेवा,
येथे होणार ७ मार्च रोजी समाधान शिबीर : ७ मार्च २०२६ रोजी जिल्ह्यातील अजयपूर (ता. चंद्रपूर), बेंबाळ (ता. मूल), पाथरी (ता. सावली), कोठारी (ता. बल्लारपूर), खांबाडा /टेंभुर्डा (ता. वरोरा), नंदोरी बु. (ता. भद्रावती), चौगान (ता. ब्रम्हपुरी), गिरगाव (ता. नागभीड), नेरी (ता. चिमूर), मोहाळी नले (ता. सिंदेवाही), गंगाराम तळोधी (ता. गोंडपिपरी), गोवरी (ता. राजुरा), गडचांदूर (ता. कोरपना) आणि पाटण (ता. जिवती) येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


