वर्धा पोलीस दलातर्फे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विद्यार्थी रॅलीचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक २६ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून, आज वर्धा जिल्हा पोलीसांनी शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सहभागाने एक भव्य जनजागृती रॅली काढली. अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे आणि युवा पिढीला या व्यसनांपासून दूर राहण्यासाठी प्रोत्साहीत करणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता.
सकाळी ७.३० वाजता शहरातील डॉ आंबेडकर चौक येथून या रॅलीला सुरुवात झाली. रॅलीमध्ये सहभागी विद्याध्यर्थ्यांनी “अंमली पदार्थांना नाही म्हणा!”, “व्यसनमुक्ती, समाज उन्नती!”, “निरोगी जीवन, सुंदर भविष्य!” असे विविध घोषणा असलेले फलक हाती घेतले होते. तसेच, व्यसनमुक्तीचे संदेश देणारी जोरदार घोषणाबाजी करत विद्याथ्यांनी शहरभर फिरून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. अनुराग जैन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अंमली पदार्थाचे मानवी आरोग्यावर आणि समाजावर होणारे गंभीर परिणाम विशद केले. त्यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून दूर राहण्याचे आवाहन केले आणि इतरांनाही याबद्दल जागरूक करण्याचे आवाहन केले.
सदर रॅलीचा समारोप डॉ अआंबेडकर चौक येथे झाला, जिथे उपस्थित मान्यवरांनी अंमली पदार्थ मुक्त समाज निर्मितीसाठी कटिवद्ध राहण्याची शपथ दिली. या कार्यक्रमात वर्धा पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी, वैद्यकीय विभाग, शिक्षण विभाग, विविध शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक विध्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धा पोलिसांच्या या उपक्रमामुळे युवा पिढीमध्ये अंमली पदार्थाविरोधात एक सकारात्मक संदेश गेला असून, भविष्यकाळात अंमली पदार्थ मुक्त समाज निर्मितीसाठी हा उपक्रम मैलाचा ठरेल अशी अपेक्षा आहे.
सदर रॅलीचे आयोजन मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक डी. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोनि, विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे, रा.पोनी. शेख मजीद शेख चशीर, पोउपनि. बालाजी लालपालवाले, राहुल इंटेकर, प्रकाश नागापूरे, पोलीस अंमलदार गिरीश कोरडे, श्रीकांत खडसे इतर कर्मचारी वर्ग यांनी केली.