कोरपना तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यां संदर्भात पल्लवी आखरे, तहसीलदार कोरपना यांच्यामार्फत मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना आज (२ जून)निवेदन सादर करण्यात आले.
तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तमराव पेचे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या ज्वलंत मागण्यांचा समावेश असलेल्या निवेदनात खालील प्रमुख मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. शेतकऱ्यांवर असलेले कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी संपूर्ण पीक कर्ज माफ कराव. शेती पंपांसाठी पाच विद्युत खांबापर्यंत वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याची विनंती. केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमतीत केलेली वाढ कमी करावी, जेणेकरून शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा कमी होईल. वनहक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या सामायिक जमिनींची मोजणी करून स्वतंत्र सातबारा तयार करावा, ज्यामुळे शेतकऱ्यांना फॉर्मर आयडी मिळून शासकीय योजनांचा लाभ घेता येईल.
7 मे 2024 रोजी ढगफुटीसदृश पावसामुळे जेवरा व लोणी येथील घरकुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पंचनामे झाले असूनही, एक वर्षाहून अधिक कालावधी लोटला तरी अनुदान मिळालेले नाही. तेव्हा त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा, शेतमालाला खर्चाच्या आधारावर योग्य आधारभूत किंमत (MSP) मिळावी. यामध्ये कापसासाठी 12,000 रुपये, सोयाबीनसाठी 7,000 रुपये, चणासाठी 6,000 रुपये, तुरीसाठी 10,000 रुपये आणि इतर पिकांसाठी खर्चानुसार MSP जाहीर करावी. कोरपना तालुक्यात तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत मंजूर कामांना निधीअभावी प्रगती नाही. यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा. रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात झालेल्या कामांचे लाभार्थ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. ही रक्कम त्वरित देण्याची मागणी करण्यात आली.
निवेदन सादर करताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तमराव पेचे यांच्यासह विजयराव बावणे (संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक, चंद्रपूर), श्याम भाऊ रणदिवे (माजी पं. स. सभापती), संबा पा. कोवे (उपसभापती), गणेश भाऊ गोडे (संचालक, कृ.बा.उ.स., कोरपना), भाऊजी पा. चव्हाण (माजी संचालक), शैलेश लोखंडे (माजी अध्यक्ष, तालुका युवक काँग्रेस), उमेश राजुरकर (माजी अध्यक्ष, संजय गांधी निराधार), सगीर भाई (उपसरपंच), सुरेश पा. मालेकर, संजय जाधव (अध्यक्ष, वि.भ.जा.), अनिल गोंडे (माजी उपसरपंच), प्रशांत घोडाम, आणि श्री. शंकर सिडाम उपस्थित होते.
या निवेदनाद्वारे कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची विनंती यातून करण्यात आली आहे. तहसीलदार पल्लवी आखरे यांनी निवेदन स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन यावेळी दिले.