जिवतीत जिओचे नेटवर्क कासवगतीने!
डिजिटल इंडियाचा नारा फोल, ग्राहकांमध्ये संताप सेवा सुधारण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- जिवतीतील जिओचे मोबाईल ग्राहक गेल्या आठवड्यापासून नेटवर्क समस्यांचा सामना करत आहेत. जिवतीत जिओचे टॉवर असूनही नेटवर्क मिळत नसल्यामुळे कॉल्स करणे आणि इंटरनेट वापरणे अशक्य झाले आहे. मोबाईलवर वारंवार नेटवर्क क्षेत्राबाहेर असा संदेश येत असून, इंटरनेटचा वेग इतका कमी आहे की शैक्षणिक व व्यावसायिक कामांवर मोठा परिणाम झाला आहे. नेटवर्कच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण ठप्प झाले आहे.
शिक्षकांनाही ऑनलाईन कामे करण्यासाठी अडचणी येत आहेत. व्यावसायिकांना ईमेल्स व ऑनलाईन व्यवहार करणे कठीण झाले आहे. रुग्णालयांतील आपात्कालीन सेवा देखील प्रभावित झाल्या असून, तातडीच्या वैद्यकीय प्रसंगी लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
मोबाईल ग्राहकांना दैनंदिन कामासाठी नेटवर्क शोधत भटकावे लागत आहे. ग्राहकांचा वेळ आणि पैसा वाया जात असून मानसिक तणाव वाढत आहे. जिओच्या वाढलेल्या रिचार्ज दरांमुळे ग्राहकांना मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. मात्र, दर्जेदार सेवा न मिळाल्यामुळे संतप्त ग्राहक जिओला जबाबदार धरत आहेत. आम्ही वेळेवर रिचार्ज करूनही नेटवर्क मिळत नाही. जिओने सेवा सुधारावी किंवा आम्हाला पर्याय द्यावा.
अन्यथा नंबर पोर्टेबिलिटीचा पर्याय वापरावा लागेल, अशी मागणी जिओ मोबाईल ग्राहक करत आहेत. कंपनीने नेटवर्क टॉवरची तपासणी करून सेवा सुरळीत करावी, अशी स्थानिकांची आग्रही मागणी आहे. डिजिटल युगात मोबाईल नेटवर्क ही अत्यावश्यक सेवा बनली आहे. अशा परिस्थितीत जिओच्या समस्यांमुळे डिजिटल इंडियाचा नारा जिवतीत फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे. कंपनीने तातडीने दखल घेत समस्यांवर उपाययोजना करावी, अशी ग्राहकांची अपेक्षा आहे.
समस्यांमुळे ग्राहक त्रस्त,डिजिटल इंडियाच्या घोषणेनंतरही मोबाईल नेटवर्कच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. जिओ नेटवर्कमुळे दैनंदिन कामांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत असून, ग्राहकांत प्रचंड नाराजी आहे. रिचार्ज दर वाढले असतानाही सेवा सुधारत नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.