अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना शासनाने त्वरीत मदत करावी – संतोषसिंह रावत

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर जिल्हयात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकारी बांधवांचे पिकांचे फार मोठे नुकसान झालेले असून शासनाने त्वरीत पंचनामे करून जिल्हयातील शेतकरी बांधवांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यांत यावी अशी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राज्याचे मुख्यमंत्री मा. नाम. श्री. एकनाथराव शिंदे, व राज्याचे विरोधी पक्षनेते मा. विजयभाउ वडेट्टीवार यांचेकडे बॅकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांनी मागणी केली आहे.
चंद्रपूर जिल्हयात दि. २५.११.२०२३ रोजी व त्यानंतर सर्वदुर अवकाळी मुसळधार पाउस आल्यामुळे शेतकरी बांधवांचे शेतात मळणीकरीता कापण्यांत आलेले धान, तसेच शेतातील कापुस ओला होउन हातात आलेले पिक डोळयासमोर खराब झाल्यामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच रब्बी पिकाची पेरणी करण्यांत आली असून अवकाळी पावसामुळे तुर, हरभरा, गहु इ. रब्बी पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे. यापूर्वी मागील वेळी अतिवृष्टी मुळे शेतक-यांचे सोयाबीन व इतर पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. व आता याच हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचे हातात आलेले धान, कापुस पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. व रब्बी पिकावर सुध्दा याचा मोठया प्रमाणात परिणाम होणार आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच शेतकरी बांधव हवालदील झालेला असून अवकाळी पावसामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी बांधव प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या आत्महत्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने त्वरीत पंचनामे करून शेतकरी बांधवांना तातडीची मदत द्यावी अशी बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांनी पत्राद्वारे अशी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राज्याचे मुख्यमंत्री मा. नाम. श्री. एकनाथराव शिंदे, व राज्याचे विरोधी पक्षनेते मा. विजयभाउ वडेट्टीवार यांचेकडे मागणी केली आहे.