मातोश्री विद्यालयात ग्रामगीतेतील आदर्श जीवनमुल्ये’ विषयावर मार्गदर्शन संपन्न
राष्ट्रसंतांनी ग्रामसुधारणेच्या कार्यास सैद्धांतिक दिशा दिली - प्राचार्य सुर्यकांत खनके
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
आपण मुल्य शब्द अनेकदा वापरतो. चांगलं काय आणि वाईट काय हे ठरविण्याचा निकष म्हणजे जीवन मुल्ये. व्यक्तींची आदर्श जीवन जगण्याची मूल्ये , समाज जीवन जगण्याची मूल्ये, राष्ट्रीय मूल्ये जीवनात उतरविल्यास आपण एक जबाबदार नागरिक बनू शकतो. ग्रामगीतेच्या पानोपानी आदर्श जीवनमुल्यांचा विचार दिसून येतो , असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रांती पर्व आॅगष्ट महिन्याच्या निमित्ताने स्थानिक मातोश्री विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शनच्या दृष्टीने बंडोपंत बोढेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य सुर्यकांत खनके होते. मातोश्री विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बी.डी. बिजवे, प्राथमिक विभागाचे मुख्याद्यापक पी. आर. वसुले, मातोश्री अॅकेडमी च्या मुख्याध्यापिका सौ. कल्याणी बावणे , पर्यवेक्षक पी. एम. रोकमवार, राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे सदस्य श्री.अभय घटे आदींची यावेळी उपस्थिती होती.
प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. बी.डी.बिजवे यांनी केले. आणि येत्या १८ आॅगष्ट रोजी होत असलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेची माहिती दिली. श्री. बोढेकर पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे अनेक विषय राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेत आहे. त्यांनी दिलेला समग्र विचार आणि आदर्श जीवनमूल्ये म्हणजे सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य सुर्यकांत खनके म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खेड्याच्या उन्नतीचा मार्ग सांगितला. त्यांनी ग्रामसुधारणेच्या कार्यास सैद्धांतिक दिशा दिली, असे ते म्हणाले.
शालेय उपक्रम राबविण्यात व विद्यार्थ्यांमध्ये जीवनमूल्ये रूजवण्याचे उत्तम कार्य ही शाळा करीत असल्याबद्दल राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे वतीने प्राचार्य सुर्यकांत खनके यांना ग्रामगीता ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास शाळेचे सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.