जिल्ह्यातील डीएपी खताचा तुटवडा दूर करण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा प्रभावी पाठपुरावा; कृषी सचिवांनी कृषी केंद्रांना डीएपी खताचा पुरवठा करण्याचे दिले आश्वासन
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्र; चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांमध्ये डीएपी खताचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी

चांदा ब्लास्ट :
आ. मुनगंटीवार यांची कृषी सचिव परिमल सिंह यांच्याशी दूरध्वनीवरून सकारात्मक चर्चा; डीएपी खताच्या पुरवठ्याबाबत केले आश्वस्त
चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधून त्यांच्या हितासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा शेतकरी हिताचा महत्त्वाचा प्रश्न शासनदरबारी प्रभावीपणे मांडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या डीएपी खताच्या तुटवड्याची गंभीर दखल घेत त्यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्र पाठवून जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांमध्ये, विशेषतः बल्लारपूर, मुल, पोंभूर्णा व चंद्रपूर तालुक्यात डीएपी खताचा तातडीने पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली. यासोबतच त्यांनी राज्याचे कृषी सचिव परिमल सिंह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून चंद्रपूर जिल्ह्यातील परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. यावेळी कृषी सचिवांनी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांना डीएपी खताचा पुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन आ. मुनगंटीवार यांना दिले.
भाजपा किसान मोर्चाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बंडू मधुकर गौरकार यांनी सादर केलेल्या निवेदनाची दखल घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी हा विषय शासनाकडे तातडीने मांडला आहे. सध्या खरीप हंगामातील पेरणी सुरू असून जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर डीएपी खताची मागणी करीत आहेत. मात्र, अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये डीएपी खताचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. त्यामुळे पेरणीनंतरच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर शेतीची कामे खोळंबण्याची आणि पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.
आ. मुनगंटीवार यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, सध्या पावसाचे वातावरण शेतीसाठी अनुकूल असल्याने शेतकरी युद्धपातळीवर शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा वेळी डीएपी खताचा सुरळीत पुरवठा न झाल्यास उत्पादनात घट येण्याबरोबरच शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे कृषी विभागाने संबंधित खत उत्पादक कंपन्या व वितरकांशी तातडीने समन्वय साधून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांमध्ये, विशेषतः बल्लारपूर, मुल, पोंभूर्णा आणि चंद्रपूर तालुक्यात डीएपी खताचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा. तसेच शेतकऱ्यांना खताचा वेळेत आणि सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, केवळ पत्रव्यवहारावर न थांबता आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयाचा वैयक्तिक पाठपुरावा करत राज्याचे कृषी सचिव श्री. परिमल सिंह यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. चंद्रपूर जिल्ह्यातील डीएपी खताच्या तुटवड्याची गंभीर परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देत तातडीने डीएपी खत पुरवठा करण्याची मागणी केली. आ. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याची दखल घेत कृषी सचिव श्री. परिमल सिंह यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांना आवश्यक त्या प्रमाणात डीएपी खताचा तातडीने पुरवठा करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिले. या आश्वासनामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच डीएपी खत उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ शासनापर्यंत पोहोचवून थांबणे नव्हे, तर त्यांचे वेळेत निराकरण होऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करणे, हीच लोकप्रतिनिधी म्हणून आपली कार्यशैली असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वेळोवेळी कृतीतून सिद्ध केले आहे. खरीप हंगामात कोणत्याही शेतकऱ्याला खताअभावी नुकसान सहन करावे लागू नये, त्यांच्या कष्टाचे मोल जपले जावे आणि शेती उत्पादनावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये, यासाठीच त्यांनी हा प्रभावी पाठपुरावा केला आहे.



