राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कनिष्ठ महाविद्यालयीन ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शासकीय वसतिगृहांची मागणी; आ. सुधीर मुनगंटीवार यांचे सरकारला पत्र
उच्च शिक्षणासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना स्वतंत्र शासकीय वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करण्याचा आ.मुनगंटीवार यांचा आग्रह

चांदा ब्लास्ट
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गळतीला आळा घालण्यासाठी तातडीने धोरणात्मक निर्णयाची अपेक्षा
मुंबई : राज्यातील ग्रामीण, दुर्गम आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागातील अनेक ओबीसी (इतर मागासवर्गीय) विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासाठी गावापासून दूर जावे लागते. मात्र, सुरक्षित व परवडणाऱ्या निवासाच्या मर्यादित सुविधांमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळे निर्माण होतात, तर काहींना शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येते. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शासकीय वसतिगृहे सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री मा. अतुलजी सावे यांना सविस्तर पत्र पाठवून तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
पत्रात आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे की, विद्यमान वसतिगृहांची क्षमता अनेक ठिकाणी अपुरी पडत असून, कनिष्ठ महाविद्यालयीन ओबीसी विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार स्वतंत्र वसतिगृहांची आवश्यकता आहे. अशा वसतिगृहांमुळे ओबीसी विद्यार्थ्यांना सुरक्षित निवास, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि कौशल्य विकासासाठी आवश्यक वातावरण उपलब्ध होईल. परिणामी शैक्षणिक गळती कमी होऊन उच्च शिक्षणातील सहभाग वाढण्यास मदत होईल.
या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समितीने पुढाकार घेतला असून, १४ जुलै रोजी राज्यभर ‘विद्यार्थी आक्रोश सत्याग्रह’ आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या या मागणीची दखल घेत शासनाने राज्यव्यापी धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही भूमिका आ. मुनगंटीवार यांनी पत्राद्वारे मांडली आहे.
शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देणे ही सामाजिक न्यायाची मूलभूत गरज असल्याचे नमूद करत ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शासकीय वसतिगृहांची उभारणी करणे ही काळाची गरज असल्याचेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.



