ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराजस्व अभियान जनतेसाठी परिणामकारक ठरावे यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे – आ. जोरगेवार

विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमातून साजरा होणार  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस

चांदा ब्लास्ट

येत्या २२ जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. चंद्रपूरातही या सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, या निमित्ताने प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणारे ‘महाराजस्व अभियान’ यशस्वीपणे राबविण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.

या बैठकीला जिल्हाधिकारी वसुमना पंत, मनपा आयुक्त नरेश अनुकुरी, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रमोद चौघुले, तहसीलदार विजय पवार, घुग्घूस नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्यासह आदिवासी विकास विभाग, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, महावितरण विभाग, पाटबंधारे विभाग, वन विभाग, महिला व बालकल्याण विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्रणी बँक व्यवस्थापन विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, आरोग्य विभाग, कृषी विभाग, भूमी अभिलेख विभाग, पंचायत समिती तसेच इतर विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जनतेपर्यंत शासकीय योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचविणे, सामाजिक उपक्रमांचे नियोजन करणे तसेच पारदर्शक, सुलभ आणि वेळेत शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता, तो सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा आणि जनकल्याणाचा उत्सव ठरावा, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत आणि प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत निराधार प्रमाणपत्रांचे वितरण, घरकुल व इतर योजनांशी संबंधित पट्ट्यांचे वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव, वन विभाग व कृषी विभागामार्फत फळझाडांचे वितरण, विविध शासकीय कागदपत्रांचे वाटप, विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी (मोटिव्हेशनल) कार्यक्रम, खेळाडूंचा सत्कार, दिव्यांग बांधवांना सहाय्यभूत साहित्याचे वितरण यासह विविध सामाजिक व जनकल्याणकारी उपक्रमांचे नियोजन करण्यात आले.

याशिवाय प्रत्येक उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, लाभार्थ्यांची निवड, विभागनिहाय जबाबदाऱ्या आणि कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन याबाबतही अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासन आणि सर्व विभागांच्या समन्वयातून ‘महाराजस्व अभियान’ अधिक प्रभावी व लोकाभिमुख करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून सेवा, विकास आणि जनकल्याणाचा संदेश अधिक व्यापक करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये