विकसित कृषी संकल्प अभियानात विद्यार्थ्यांचा सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला,शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार,भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा,कृषी विभाग आत्मा बुलढाणा तसेच कृषी विभाग देऊळगाव राजा यांच्या वतीने सुरू असलेल्या विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत विविध खेड्यामध्ये खरीप पिक, पाणी देण्याच्या पद्धती, खत व्यवस्थापन व पीक बदल यावर मार्गदर्शन करण्यात आले. या परिषदेत शास्त्रज्ञ डॉ. दास ,डॉ.सुरेंद्रन, डॉ. निर्मल कुमार कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. अमोल झापे,प्रा.देशपांडे प्रा. करडे अनिल जाधव, नंदकिशोर ढोरे, समर्थ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, प्रा.चगदळे तसेच कृषी विभागाचे समाधान गाडेकर, दिलीप शिंगणे व श्रीकांत पडघान, अनंता देशमुख उपस्थित होते. याप्रसंगी सिंदखेडराजाचे आमदार मनोज कांयदे यांनी शास्त्रज्ञ डॉक्टर दास यांचा सत्कार केला.यामध्ये शास्त्रज्ञांनी पाण्याची बचत, अन्नद्रव्याचा वापर केल्यामुळे हातावरील खर्च कसा कमी होतो हे सांगितले. त्याचप्रमाणे मजुरावर असलेले अवलंबन कसे कमी करता येईल व भविष्यातील शेती तांत्रिक पद्धतीने करावी याबाबत मार्गदर्शन केले.पाणी बचत करून जमिनीमध्ये पाण्याचा साठा कसा वाढला पाहिजे, पाण्याचं नियोजन करून शेतीसाठी त्याचा योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी ड्रीप, तुषार सिंचन या पद्धतीचा वापर तसेच मल्चिंग पेपर याचा वापर करून उत्पन्न वाढवता येईल असे सांगितले. शेतकऱ्यांनी नियमित पीक पद्धतीमध्ये बदल करावे
याबद्दल मार्गदर्शन केले या भागांमध्ये मुख्यतः कापूस,सोयाबीन मिरची, तूर व इतर भाजीपाला पिके याचे उत्पादन घेतले जाते . सोबतच या पिकामध्ये फेरपालट करून आपण मक्याचे उत्पादन वर्षभरातून तीन वेळेस घेऊ शकतो यामधून आपले आर्थिक स्थिती ही मजबूत होईल असे सांगितले. निर्मल कुमार यांनी मृदा आरोग्य आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन बाबत शेतकऱ्यांना अवगत केले.
प्रा.देशपांडे यांनी रोग-किडी नियंत्रण, लाईट ट्रॅप, हुमणी अळीचे नियंत्रण कसे करावे यावर सविस्तर माहिती दिली. या अभियाना अंतर्गत कार्यक्रम हा पिंपळगाव चिलमखा, गिरोली बुद्रुक, निमखेड,गोळेगाव आसोला , तुळजापूर व जांभोरा या खेड्यामध्ये घेण्यात आला.प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी पाण्याचा वापर हा योग्य पद्धतीने करून पाण्याची बचत कशी होईल त्यानंतर पाऊसद्वारे पडलेले पाणी हे जमिनीमध्ये कशा पद्धतीने मुरवता येईल व कापसावर कापूस मक्यावर मका पिकवू नका. अशा प्रकारच्या एकाच पिकाच्या लागवडीमुळे विशिष्ट रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि जमिनीची पोषण शक्ती कमी होऊन उत्पादन घटते असे सांगितले.
पिकांचा फेरपालट केल्यामुळे सर्व प्रकारची अन्नद्रव्य जमिनीत संतुलित राहतात असे सांगितले. यांनी डॉ. अमोल झापे यांनी पिकावरील विविध रोग व त्याचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथे भेट देऊन तेथील विविध उपक्रम पहावे असे सांगितले. प्रा. चगदळे यांनी एकात्मिक कीड नियंत्रण कसे करावे याविषयी सविस्तर माहिती दिली व शेतकऱ्यांनी निंबोळी अर्क तसेच जैविक कीटकनाशक याचा उपयोग करून आपल्याला खर्च कसा कमी करता येईल याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमास समर्थ कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक व गावातील शेतकरी मंडळी याचा सहभाग होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे,कृषी विभाग, प्रा.देशपांडे ,प्राचार्य डॉक्टर नितीन मेहेत्रे,प्रा. चगदळे ,विद्यार्थी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.