संततधार पावसामूळे अनेक मार्ग बंद, जनजीवन विस्कळीत
अनेक घरांची पडझड ; सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार
काल पासुन सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सावली तालुक्यातील अनेक नदी आणि नाल्यांना पुर आला आहे. तालुक्यातील अनेक घरांमध्ये आणि सावली शहरातील अनेक वार्ड आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेक घरांचे नुकसान झाल्याने अनेक कुटूंबाचे बेहाल झाले आहे. पोलीस स्टेशन सावली हद्दीत येणाऱ्या नदी आणि नाले तुडूंब वाहत असुन अनेक सकल भागात पाणी साचल्याने अनेक मार्ग बंद झाले असुन जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सावली चारगाव मार्गावरील नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने त्या मार्गावरील गावांचा संपर्क तुटलेला आहे.सावली – जीबगाव – हरंबा मार्गावरील जिब गाव नाल्यवरून पाणी वाहत असल्याने सदर मार्ग बंद आहे..तसेच बोथली – सावली मार्गावर असलेल्या नाल्याला पाणी असल्याने वाहतूक बंद आहे.जांब केरोडा मार्ग बंद आहे.
तालुक्यात जवळपास १३ घरे आणि एक गुरांचा गोठा पडलेला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अंतरगाव येथील तीन घरे पडली असून त्या कुटुंबाची व्यवस्था समाज मंदिर मध्ये करण्यात आली असून पाथरी येथील तीन राहत्या घरांची पडझळ झालेलीआहे.सावली येथील गणपत श्रावण सोनुले प्रभाग ११ यांचे राहते घर पडल्याने नुकसान झाले आहे. बोथली येथील वासुदेव प्यारमवार यांचा गुरांचा गोठा,भगवंत मडावी यांचे घर,आणि देवराव गेडाम यांचे स्नानगृह संततधार पावसामुळे पडले.
तसेच तालुक्यातील अनेक भागात पुर परिस्थिती असल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पावसाचा जोर कायम असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सावलीत तालुक्यात काल झालेल्या पावसाची सरासरी नोंद १४४.५मिमी नोंद करण्यात आली असून सावली सर्कल १३४.४मिमी, पाथरी सर्कल १५४.२मिमी आणि व्याहाड सर्कल १४०.००मिमी अशी आहे.
महसुल व पोलीस प्रशासन पुर परीस्थितीवर लक्ष ठेवुन आहेत. नागारीकांनी संततधार पाऊस आणि पुर परिस्थिती लक्षात घेवुन प्रशासनास सहकार्य करावे.,असे आवाहन प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.
सावली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अनेक रस्ते पुरांनी वेढले असून अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटलेला असून ज्या ज्या मार्गावरील पुलावरून पाणी वाहत आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सोबत आपदा व्यवस्थापन टीम सहकार्य करीत आहे.कुठलीही जीवित हानी घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे.
जीवन राजगुरू, ठाणेदार, पोलीस स्टेशन,सावली.
काल झालेल्या पावसामुळे अनेक घरे पडली असून पंचनामे करण्याचे आदेश पटवारी,आर. आय.यांना दिलेले आहेत.तसेच तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी दौरा सुरू असून याबाबत संपूर्ण माहिती घेऊन नुकसानीची माहिती शासनाकडे दिल्या जाईल.
प्रांजली चीरडे, तहसीलदार,सावली.