पाण्याविना धोक्यात आली खरीपाची धानरोवणी, सावली तालुक्यातील शेतकरी संकटात
गोसीखुर्द कालव्याला पाणी सोडण्याची अध्यक्ष खुशाल लोडे ची मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली :_ तालुक्यातील शेतकरी सध्या पाण्याअभावी मोठ्या संकटात सापडले आहेत. खरीप हंगामातील धानाची रोवणी अर्ध्यावर थांबली असून पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे *गोसी खुर्द धरणाच्या असोला-मेढा उजव्या कालव्याला तातडीने पाणी सोडून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे* अशी मागणी तालुक्यातील विविध सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष *खुशाल लोडे* यांनी केली आहे.
अध्यक्ष खुशाल लोडे यांनी सांगितले की, तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने धानाची पेरणी केली आहे. जून महिन्यात पावसाने दांडी मारल्याने पेरणी लांबली. जुलैच्या सुरुवातीला पाऊस पडल्याने पिके जमिनीतून बाहेर आली आणि शेतकऱ्यांनी रोवणीसाठी रोपे तयार केली. परंतु आता जुलै महिना अर्धा उलटूनही पुन्हा पाऊस न झाल्याने सर्व रोपे कुमेजत आहेत.
*”जर गोसी खुर्दच्या उजव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडले नाही तर शेतकऱ्यांची रोवणी पूर्ण होणार नाही. तयार झालेली रोपे वाया जातील आणि शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल”*, असे अध्यक्ष खुशाल लोडे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, आधीच पावसाअभावी तालुक्यातील शेतकरी अडचणीत आहे. वेळेवर रोवणी झाली नाही तर संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात येईल. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन तातडीने कालव्याला पाणी सोडावे.
या मागणीसाठी खुशाल लोडे, सुशील डहलकर, कालिदास मंगर, रमाकांत वाघरे, खुशाल चुधरी, विठ्ठल वाढणंकर, विवेक बारेकर, जितू लाडे, बंडू गुरनुले, विलास गुरनुले, लुमाजी भोयर, अभय दाजगाये, वामन दाजगाये, प्रशांत रंडये, विनोद भंडारे, दौलत धुर्वे, हेमंत धुर्वे, महेश गुरनुले, गजानन धुर्वे, हर्षल मुंघाटे, प्रभाकर भोयर* आदी शेतकरी नेत्यांनी प्रशासनाकडे निवेदन देणार असल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळावे आणि खरीप हंगाम वाचावा यासाठी गोसी खुर्द प्रकल्प प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आता तालुकाभरातून होत आहे.



