खासदार प्रतिभा धानोरकर यांची मागणीची तात्काळ दखल.
शेती सिंचनासाठी गोसेखुर्द प्रकल्पातून आसोलामेंढा तलावात पाणी सोडण्याचे मा. जिल्हाधिकारी यांचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश.
चांदा ब्लास्ट
पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीकरीता पाहिजे तसा अद्यापही पाऊस झालेला नाही. खरीप हंगामात दुबार पेरणीचे संकट डोक्यावर असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील मुल पोंभुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी गोसेखुर्द प्रकल्पातून आसोलामेंढा तलावात पाणी सोडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देण्याची लोकहितकारी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता, आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण विभाग सावली, जि. चंद्रपूर यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे.
पुर्व विदर्भात अद्यापही पावसाने दडी मारली असून शेतकऱ्यांना पाहिजे तसा पाऊस पडला नाही. अनेक शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा आहे. त्या संदर्भात मुल पोंभुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांनी गोसेखुर्द प्रकल्पातून आसोलामेंढा तलावात पाणी सोडण्याची मागणी निवेदनातून केली होती. त्या मागणी ची दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मा. जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून गोसेखुर्द प्रकल्पातील पाणी तात्काळ आसोलामेंढा तलावात सोडून त्या पाण्यातून पोंभुर्णा व मुल तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. त्यासंदर्भात चालू आठवड्यात गोसेखुर्द प्रकल्पातील पाणी आसोलामेंढा तलावात सोडून मुल व पोंभुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीतील सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देणार असल्याचे मा. जिल्हाधिकारी यांनी सांगितले. या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सिंचनाखाली येणार असून शेतीतील उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे.