एन.सी.सी. व्यक्तिमत्त्व विकास घडविणारी चळवळ – ग्रूप कमाडंर खुशाल व्यास
एन.सी.सी.चे वार्षिक प्रशिक्षण शिबिर संपन्न - दहा दिवसीय शिबीरात 400 छात्र सैनिकांचा समावेश
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : ‘एकता व अनुशासन’ या ब्रिद वाक्याप्रमाणे एन.सी.सी. च्या प्रशिक्षणातून छात्र सैनिकांचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक विकास घडवून आणला जातो. सैनिकी मानसिकता निर्माण करून त्यांच्यात एका सैनिक अधिकाऱ्याला आवश्यक असलेले गुण विकसित केले जाते. म्हणजेच एन.सी.सी. व्यक्तिमत्त्व विकसित करणारी चळवळ होय, असे प्रतिपादन नागपूर विभागीय एन.सी.सी.चे ग्रूप कमाडंर ग्रूप कॅप्टन खुशाल व्यास यांनी एन.सी.सी. वार्षिक प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी दिलेल्या सदिच्छा भेट प्रसंगी 15 जुलै रोजी बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात केले.
या प्रसंगी शिबिर प्रमुख तथा 21 महाराष्ट्र एन. सी. सी. बटालियनचे कमाडंट कर्नल समिक घोष, प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल नवनित थापा, सुबेदार मेजर दिलबाग सिंग, एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर, कॅप्टन प्रविण ठाकरे, लेफ्टनंट पद्माकर दारोंडे, रूपेश उईके, सिंधू खुशवा व महिला छात्र प्रशिक्षक साधना पाल उपस्थित होते.
सदर शिबिरात वर्धा व चंद्रपूर जिल्ह्य़ातील 400 छात्र सैनिकांचा समावेश असून त्यांना ड्रील, शारीरिक कवायत, अडथळा पार प्रशिक्षण, निशानेबाजी, युद्ध कौशल्य, नकाशा वाचन, सैन्यातील शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण, बौद्धिक खेळ, आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार, व्यक्तिमत्त्व विकास व नेतृत्व कला विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या शिवाय 100 मी. दौड, पोस्टर्स मेकिंग, लेखन कौशल्य, रस्सीखेच स्पर्धा, कबड्डी, व्हॉलीबॉल, प्रश्न म॔जुषा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता.
सदर शिबिरादरम्यान वाहतूक पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी ‘अपघात कसे टाळता येतील’, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शुभम घोरपडे यांनी ‘आपत्ती व्यवस्थापन – आपली जबाबदारी, नगर परिषद फायर ब्रिगेड तर्फे ‘आग नियंत्रण’, कॅप्टन मोहन गुजरकर यांनी व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वकला व आपत्ती व्यवस्थापनात एन.सी.सी.छात्र सैनिकांची भुमिका, महिला छात्र प्रशिक्षक साधना पाल यांनी ‘एन.सी.सी.छात्र सैनिकांची जबाबदारी’, कॅप्टन प्रविण ठाकरे यांनी ‘एन.सी.सी. परीक्षेची रचना’ व थर्ड ऑफिसर रूपेश उईके यांनी ‘सामाजिक उपक्रमात छात्र सैनिकांचा समावेश’ या विषयावर व्याख्यान दिले.
शिबिरादरम्यान नागपूर ग्रूप एन.सी.सी.च्या वतीने कर्नल सी.एस. सोळंकी यांनी भेट दिली. आयोजित 100 मी. दौड स्पर्धेत महाविद्यालयीन मुलांमधून कॅडेट यश तायवडे, अनिकेत सातपैसे व यश पौनीकर तर मुलींमधून गायत्री बाबडे, ॠचीका बालापूरे व दिव्यांशी साखरकर यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले. शालेय मुलांमधून 100 मी. दौड स्पर्धेत यश काटकोरीया, रणबीर पवार व आर्यन मांदाडे तर मुलींमधून कशीश शेंडे, दिव्यांशी पटले व ऋशल नगराळे यांनी प्रथम तीन पुरस्कार मिळवले.
ड्रिल स्पर्धेत प्रतीक पचारे, आशिष भोगांडे व पृथ्वीराज शेंडे तर मुलींमधून राखी भस्मे, प्रतीक्षा सातघरे व श्रद्धा मडावी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त केले. रांगोळी स्पर्धेत श्रद्धा साखरकर, जाणव्ही खेडकर व हमिक्षा वैद्य तर शालेय गटातून प्रणाली लोखंडे, आर्या भांडेकर व दिशा देशमुख यांनी प्रथम तिन पुरस्कार प्राप्त केले.
‘गार्ड ऑफ ऑनर’ करीता कॅडेट रितेश बुटे याला तर प्रश्न मंजुषा स्पर्धेकरीता हार्दिक खारकर, क्रिश दाते, दिव्या पाटिल व आर्यन भांडारकर यांच्या गटाने प्रथम क्रमांक प्राप्त केला.
शिबिराच्या समारोपाच्या दिवशी ‘सांस्कृतिक संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात देशभक्तीपर नृत्य, सर्वधर्मसमभाव नृत्य नाटीका, लावणी, गोंधळ व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराच्या समारोप प्रसंगी शिबिर प्रमुख तथा एन.सी.सी.चे कमान अधिकारी कर्नल समिक घोष यांच्या शुभ हस्ते विजेत्या छात्र सैनिकांना प्राविण्य पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मंचावर प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल नवनित थापा व सुबेदार मेजर दिलबाग सिंग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.सी.सी. अधिकारी तथा कंपनी कमांडर कॅप्टन मोहन गुजरकर यांनी केले.
शिबिरातील प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन बटालियन हवालदार मेजर भिमराव जाधव यांनी केले तर सैन्य प्रशिक्षणाची जबाबदारी नायब सुबेदार हरविंदर सिंग, नायब सुबेदार हरिप्रसाद ध्यानी, नायब सुबेदार पिंटोली कुमार, नायब सुबेदार निरज कुमार, नायब सुबेदार विजयकुमार यांच्या मदतीने हवालदार संजय पटले, हवालदार सतिश वाणी, हवालदार संदीप दुधे, हवालदार भागवत रिदधे, हवालदार देवेंद्र स्वर्गे, हवालदार योगेश पांचारे, नायक मंजीत सिंग व आकाश मांदाडे यांनी पार पाडली.
शिबिराची सांगता 16 जुलै रोजी ‘हम सब भारतीय है!……. या एन.सी.सी. गीताने झाली.