जेसीआय राजुरा रॉयल्सच्या वतीने ‘माझे स्वच्छ ताट’ अभियान
हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्याने हजारो लोकांना अन्न वाचविण्याचा दिला संदेश
चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
भारत हा कृषिप्रधान देश असुनही देशात दररोज कित्येक लोक दोन वेळचे पोटभर अन्न मिळवु शकत नाही. लाखो लोकांना बरेचदा उपाशी पोटी राहावे लागते तर दुसरीकडे मात्र मध्यमवर्गीय व धनदांडगे लोक अन्नाची वारेमाप नासाडी करत असतात. विशेषतः मंगल कार्य असो, मृत्यु भोज असो की मग सामाजिक उत्सवात वाढल्या जाणारा महाप्रसाद असो, अन्नाची नासाडी मोठ्या प्रमाणात होत असते. अन्नाची होणारी नासाडी थांबविण्यात यश आल्यास देशातील लाखो दुर्बल घटकांतील नागरिकांना दोन वेळचे भोजन मिळणे शक्य होणार असल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून तसेच जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून जेसिआय राजुरा रॉयल्स तर्फे ‘माझे स्वच्छ ताट अभियान’ राबविण्यात येत आहे.
जेसिआय राजुरा रॉयल्स ने ह्यादृष्टीने जनजागृती व्हावी म्हणून शहरातील सर्व मंगल कार्यालयात अन्नाची नासाडी होऊ नये ह्या उद्देशाने भोजन कक्षात ठिकठिकाणी ‘जेवढे जाईल पोटात तेवढेच घ्या ताटात’, ‘अन्न वाया नका घालवू, कोणाची तरी एक वेळची भूक भागवू’ अशा विविध मजकुराचे बोर्ड स्वखर्चाने लावण्यात आले असुन ह्याद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य सुरू आहे.
नुकत्याच पार पडलेल्या हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्याने शहरातील प्रमुख हनुमान मंदिर तसेच विविध मंदिरांत महाप्रसादाचे आयोजन केल्या जाते. ह्या प्रसंगी हजारो लोक दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतात हे लक्षात घेऊन जेसीआय राजुरा रॉयल्स ने संकटमोचन हनुमान मंदिर, पुरातन हनुमान मंदिर, व्यंकटेश मंदिर तसेच शहरातील विविध ठिकाणी ‘जेवढे जाईल पोटात तेवढेच घ्या ताटात’, ‘अन्न वाया नका घालवू, कोणाची तरी एक वेळची भूक भागवू’, ‘पुढच्या वेळेस ताटात अन्न उष्टे ठेवायच्या आधी विचार जरूर करा’, ‘हवे तितकेच अन्न ताटात घ्या’, ‘महिने लागतात पिकवायला, अन मिनिटे लागतात फेकायला’, ‘असेच अन्न जर टाकत राहिलो तर भविष्यात अन्नाचा तुटवडा भासेल, उपासमार होईल’, अशा विविधांगी संदेशांचे बॅनर लाऊन जनजागृती केली तसेच उपक्रमाकरीता जेसिआय अध्यक्षा स्वरुपा झंवर , सचिव मोनिशा पाटणकर, फाऊंडंर प्रेसिडंट जयश्री शेंडे , झेड व्ही पी सुषमा शुक्ला, माजी अध्यक्षा मधुस्मिता पाढी, सुशीला पोरेड्डीवार, स्मृति व्यवहारे, प्रफुल्ला धोपटे, श्वेता जयस्वाल, ज्योती मेडपल्लीवार, सिमिती चौहान, आशा चंदेल, राधा वीरमलवार, राधा धनपावडे, मेघा बोनगिरवार, दिपाली शेंडे, लीना जांभुळकर, लक्ष्मी ठाकुर, साक्षी फुलझेले यांनी हनुमान जन्मोत्सवाच्या महाप्रसाद प्रसंगी नागरिकांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांना अन्नाचे महत्व व बचतीचा संदेश दिला.
जेसिआय राजुरा रॉयल्सच्या ह्या उपक्रमाला राजुरा शहरातील नागरिकांनीही उस्फुर्त प्रतिसाद दिला असुन संस्थेच्या उपक्रमाबद्दल कौतुक तसेच आभार व्यक्त करण्यात येत आहे.