मानवी जीवनाची क्षणभंगुरता दर्शविणारे : प्रल्हाद रंगभूमीचे ‘शेवटची आंघोळ’ – प्रा. राजकुमार मुसणे, गडचिरोली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
मानवी जीवन हे नाशिवंत आणि क्षणभंगूरआहे.या सुंदर पृथ्वीतलावरील जीवनाचा आनंद निरपेक्षपणे गुण्यागोविंदाने घेऊन जीवननौका यशस्वीतेने पार करायची असते. परंतु विविध वृती- प्रवृत्तीने, विकाराने ग्रस्त होत मनुष्य कसा दुःखाच्या गर्तेत अडकतो अन् मातीमोल होतो. याचेच प्रत्यंतर प्रल्हाद मेश्राम यांच्या ‘शेवटची आंघोळ ‘या गंभीर नाटकातून होते.
प्रेमात आकंठ बुडालेल्या आणि स्वतःचे अस्तित्व भान हरपलेल्या आकांत , आपल्या स्वार्थासाठी वाटेल ते करणाऱ्याची दैन्यावस्था , नियतीच्या मगरमिठीत अडकलेल्या अबोलीची व्यथा म्हणजे नाटककार प्रल्हाद मेश्राम यांच्या झाडीपट्टीतील प्रल्हाद रंगभूमीचे ‘शेवटची आंघोळ’ हे नाटक आहे.
प्रल्हाद नाट्य रंगभूमी वडसा प्रस्तुत, सनिक मेला उत्सव मंडळ गरा (पत्रा पो. स्टशन), जिल्हा गोंदिया आयोजित निर्माता, दिग्दर्शक, नाटककार कवी प्रल्हाद मेश्राम यांच्या’ शेवटची आंघोळ’ या नाटकाचा यशस्वी प्रयोग १४ डिसेंबरला रात्री संपन्न झाला.
समाजकारण आणि राजकारणात नेहमी व्यस्त असणाऱ्या आई व आपल्या मार्गात आडकाठी ठरणाऱ्या संपत्तीत वाटेकरी होणाऱ्या सख्ख्या भावास घराबाहेर काढणारा सारंगा हा या नाटकात अनेक घटना घडवून आणतो. अबोलीवरील एकतर्फी प्रेमामुळे अबोलीच्या पतीचा म्हणजेच प्रणयचा अपघात घडवणारा, अबोली आपल्याला मिळावी यासाठी तीचा मामा चिंतामणीला पाच लाखाची लालच दाखवणारा, अबोलीवर अत्याचार करणारा सारंगा विविध कृत्यातून स्वतःचेच अस्तित्व हरवून बसतो,त्याच्या कृतीचा अतिरेक होताच शारदा सारंगाला त्रिशूलने ठार करते. सामाजिक प्रतिष्ठा जपत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या समाजशील गोविंदाची चिंतामणी स्वार्थापायी बदनामी करतो. विधवा अबोलीशी अनैतिक संबंध असल्याचे सर्वांना सांगून तो कसा अविवेकी आहे हे पटवून देतो. परिणामी प्रामाणिक असणाऱ्या गोविंदला व्यभिचारीपणाचा आरोप जिव्हारी लागतो. सहकारी व समाज आपल्याकडे विकृत दृष्टीने पाहतो हे त्याला सहन होत नाही.व्यभिचारी म्हणून आळ घेत हिणवतात, चिडवतात, अवमूल्यन करतात, त्यामुळे त्याला जगणे नकोसे वाटते.पश्चाताप व आत्मक्लेषातून गोविंद प्राण त्याग करतो. जिद्दीने संघर्षरत असलेल्या प्रणयचा अपघातात मृत्यू होऊन सर्व स्वप्न धुळीस मिळतात. देवदत्त व शकुंतला दुःखाची दाहकता निमुटपणे सहन करतात. एका दिंडीत त्यांना शांती भेटतो. देवदत्त व शकुंतला त्यांच्याकडील अस्थी कलश भामटा चोरून नेण्याचा प्रयत्न करत असतानाच शांती चोरापासून हिसकावून तो त्यांच्या हवाली करतो. शांतीस मुलगा म्हणून स्वीकार करतात.गोविंद गुरुजींच्या सांगण्यावरून शांती विधवा अबोलीशी विवाह करतो. देवदत्तला हे सहन होत नाही. धक्का जीवावर बेततो. तसेच अबोली चिंतामणी मामाला भेटते. पाच लाखाच्या लालचेने अघटीत कृत्य करणारा चिंतामणी मामा बदफैली म्हणून अबोलीची निर्भत्सना करतो,मारतो. तेवढ्यात गोविंद- चिंतामणी यांच्यात हाणामारी होते,अबोली चिंतामणी मामावर चाकूने वार करते.प्रेमात पागल झालेला सारंगा, अनिर्बंधपणे सैरभैर वागू लागतो,व्यसनाधीनता वाढत ब्लड कॅन्सरने ग्रस्त होतो.
शेवटची आंघोळ या नाटकातून प्रेम, प्रामाणिकपणाबरोबरच स्वार्थ ,कट,कारस्थान, घातपात, षडयंत्र,अत्याचार आदी घटना- प्रसंगातून प्रत्ययास येते. माणूस हा शेवटी माणूसच आहे. एकमेकांच्या भावना जपत मार्गक्रमण करावे.शेवटी अहंकार काय कामाचा? असाच संदेश नाटकातून मिळतो.
आयुष्यातली पहिली आंघोळ आणि शेवटची आंघोळ स्वतःची स्वतःही करू शकत नाही; तरी माणूस इतका गर्व कोणत्या गोष्टीसाठी करतो, हा प्रश्न ? शेवटची आंघोळ या नाटकाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात नाटककार प्रल्हाद मेश्राम यशस्वी झाले आहेत.
गुलाबचा खुर्चीला खेळून ठेवणारा विनोद रसिकप्रिय आहे. गदा -अदा, डोळे,चौकोन,त्रिकोण, विशालकोन, षटकोन, बारीक वायर , आलू सीलणे, आंबे सिलणे शाब्दिक विनोदांची फवारे वैशिषट्यपूर्ण.
हत्ती पाण्यात पडला तर का व्हईल?
दिवाळी च्या दिवशी रांगोळी शेजारी दिवे का लावतात? लग्न झालेल्या स्त्रिया कपाळावर कुंकू का लावतात? लग्न झाल्यावर मुली हातावर मेंहदी काढताना नवऱ्याचा नाव का काढतात? या गुलाबच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी नाटकच पहायला हवे.
सारंगाचे नाटकातील संवाद प्रेक्षकांना आकर्षित करणारे आहेत.’गळा कापला खोकला गेला, काम झाला’, ‘मेरा नाम सुंन के माहोल मे हो जाता है दंगा, वही हूं मै सारंगा ‘, अशा संवादाने प्रयोगात रंगत आणली.
या नाटकातली गीते जबरदस्त आहेत.स्वरबहार मंगेश सहारे, भास्कर पिंपळे यांच्या सुमधुर गायनाने तृप्तता लाभली.’ पावलांचा नाद आपुला भिजल्या या वाटा.. लुळ्या पांगळ्या देहावरती घाव घालतो काटा
मन धुंद धुंद झाले तुझ्या प्रेमात ग,डोक्यावर नाही सेव, नवऱ्याचा नाही भेव, कसा पावेल महादेव’,स्वप्न विखुरले झाले जीवनाचे, तुझे कारे कारे बाल, तुझे गोरे गोरे गाल
पोरी लाजू नको व माआझ्या जीवाचे होतें हाल,बघ प्रीतीचा रंग गुलाबी गगनी उधळला..साजणी साथ देशील मला ग ,माझे जीवन गाणे ‘, अशा बहारदार व आशयसूचक गीतामुळे नाट्यात परिणामकारकता साधली आहे.
सच्चे प्रेम करूनही नियतीच्या कसोटीवर आयुष्य पणास लागत होरपळणारी अबोली (अंकिता गायकवाड),अबोलीवर निस्सीम प्रेम करणारा कंपनीत नोकरीवर असलेला प्रणय: (मंगेश सहारे)देवदत्त (विलास नेव्हारे),संगीतरत्न रक्ताच्या नात्यांना जागणारा शिक्षकी पेशा व्रत्तस्तपणे निभावणारा, विधवा अबोलीला धीर देणारा काळजीवाहू गोविंद (भास्कर पिंपळे), चलाख, कावेबाज, लालची चिंतामणी (विवेक डांगर)
स्वार्थासाठी स्वकीयानाही दूर लोटणारा परंतु प्रेमाचा भुकेला प्रेमवीर ,स्वतःलाही विसरून जीवनयात्रा संपविणारा सारंगा (सिने अभिनेते वैभव ओगले), कटकारस्थानात माहीर असलेला चलाख चिंतामणी मामा (विवेक दांगट),प्रामाणिकतेच्या बळावर आयुष्याची उभारणी करीत गुरुआज्ञा शिरसावंद मानणारा सहकार्यशील
शांती (मंगेश सहारे), विनोदवीर गुलाब (दिनेश कोलटवार), वसुंधरा (सुदेशना नावकर), शारदा (कविता कदम), विनोदाबरोबरच दिलखेचक नृत्य पेश करणारी नयना ( प्रीती डोंगरवार) आधी पात्रांच्या संवादाद्वारे शेवटची आंघोळ हे नाटय उलगडत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. नाटकातील गंभीर विषयाने अंतर्मुख करीत विचार प्रवृत्त करते. व्यक्ती व्यक्तीतील भावनिक व सामाजिक संघर्ष नाटककार प्रल्हाद मेश्राम यांनी उत्तम मांडल्यामुळे नाटक प्रेक्षणीय झाले.
सर्व कलावंताचा कसदार अभिनय, सिने अभिनेता वैभव ओगले यांचा चतुरस्त्र अभिनय,सारंगाचा लूक,आक्रोश, गोविंदाने केलेला प्राणत्यागाचा जिवंत प्रसंग, शांतीतील सालसपणा, देवदत्तचा करारीपणा व बाप कुणाला कळलाच नाही? हे देवदत्तचें अंतर्मुख करणारे चिंतन,अबोलीची घालमेल व अस्वस्थता अनुभवण्यासाठी व शेवटच्या आंघोळीचा प्रसंगासाठी आवर्जून हे नाटक पाहावे.आर्गन पिंटू लटये, तबला मंगेश खोब्रागडे, ऑक्टोपॅड रोहन वासनिक यांच्या संगीत साथीने, राजू रस्से ,प्रल्हाद आर्ट वडसा नेपथ्य
म्युझिक ट्रॅक -इंद्रजित मेश्राम ,प्रयोग सहाय्यक सोनू खोब्रागडे,भोयर साऊंड सर्व्हिसची उत्तम ध्वनी व्यवस्थेमुळे प्रयोगास रंगत आली.
एकूणच अत्यंत चारित्र्य संपन्नतेने प्रण्यचा संसार करण्याचे सुख स्वप्न साकारणाऱ्या,निस्सीम प्रेम करणाऱ्या प्रांजळ अबोलीच्या वास्तव जीवनाची कथा म्हणजे हे नाटक आहे. विधवा विवाहाचा पुरस्कार करणारे, मानवी जीवनाची क्षणभंगुरता दर्शविणारे नाटक म्हणजे’ शेवटची आंघोळ’ होय.
प्रा.राजकुमार मुसणे, गडचिरोली