धोकादायक वर्ग खोल्यात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे!
वर्ग खोल्या मंजूर असूनही बांधकामात विलंब का? पालकांचा सवाल ; शिक्षणाधिकारी व विभाग प्रमुखाचे दुर्लक्ष
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील कुंभेझरी हे गाव महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला आहे त्यानंतर वादग्रस्त चौदा गावाची सिमा लागते. हे गाव तालुक्यातील लोकसंख्येने सर्वात मोठे गाव असून सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी तिची ओळख आहे. या गावची लोकसंख्या ३००० च्या जवळपास आहे तर या ठिकाणी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा असून ही शाळा तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यातील अव्वल क्रमांकाची शाळा अशी तिची ओळख आहे या शाळेत अनेक नवनवे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना तालुका,जिल्हा नव्हे तर राज्यस्तरावरही या शाळेने लौकिक पटकावला आहे या शाळेत वर्ग पहिली ते सातवीपर्यंत २०६ विद्यार्थी दररोज नियमित शाळेला येणारे आहेत.
शिक्षकांची कमतरता आता पूर्ण झाली असून शिक्षकही या शाळेत आगळे- वेगळे उपक्रम विद्यार्थ्यांना शिकवितात व शाळेचे नाव चमकवीत असल्याने गावकरी संपूर्ण शाळेला सहकार्य व मदत करत असतात, गेल्या दोन वर्षापासून शाळेत किचन शेड नाही त्या संदर्भात पंचायत समिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाला वेळोवेळी तक्रारी व निवेदन दिले आहेत, परंतु त्यांचा कोणताच उपयोग झाला नाही डिनर शेड विद्यार्थ्यांना बसून जेवण करण्याचे ठिकाण असलेल्या ठिकाणी त्याचा वापर किचन शेेड म्हणून करण्याची वेळ या शाळेवर आली आहे या शाळेमध्ये वर्ग चौथी ते पाचवीची वर्गखोली अत्यंत धोकादायक असून या ठिकाणी विद्यार्थी व शिक्षक हे आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणी शिक्षणाचे धडे देत आहेत. पूर्णता शाळा गळत असून प्लास्टर पूर्णता निघालेले आहे लोखंडी रॉड त्यातून उघडे पडलेले आहेत व पाण्याचे थेंब विद्यार्थ्यांच्या अंगावर पडत आहेत तसेच वर्ग पहिली, दुसरी तिसरी यांना सुद्धा पुरेशी वर्ग खोली नसल्यामुळे ते वराड्यातच बसुन शिक्षणाचे धडे गिरवत आहेत ही शाळा पी एम श्री केंद्राच्या योजनेमध्ये समाविष्ट असून तालुक्यातून ही एकच शाळा निवडलेली आहे.
त्यामुळे अशा शाळेचे अत्यंत दुरावस्था असून यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतचे उपसरपंच यांनी वेळोवेळी संबंधित विभागाला पत्र व्यवहार देऊन ही सर्रास दुर्लक्ष केल्यामुळे संपूर्ण पालकात शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे पालकातून ऐकायला मिळत आहे. तेव्हा आता पावसाळा सुरू झाला आहे, व त्यामुळे विद्यार्थ्यांना इजा, हानी व नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शिक्षण विभागाची राहील असे पालक वर्गातून ऐकायला मिळत आहे. तेव्हा यावर शिक्षण विभाग लक्ष देईल का? किंवा बांधकामाचे असलेले भिजते घोंगडे हे पूर्णतः जाईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
◆ शाळेची दुरावस्था झाल्याचे मी स्वतः शिक्षणाधिकारी पंचायत समिती यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला परंतु त्यांनी कुठलीही कार्यवाही व यासंदर्भात निर्णय घेतला नसल्याचे दिसून येत आहे.
– लहुजी गोतावळे उपसरपंच कुंभेझरी
◆ पंचायत समिती स्तरावरून तो प्रस्ताव टीएस साठी जिल्हा परिषद कडे पाठवलेला आहे त्यांच्याकडून प्रमा झाल्यास त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
– डॉ भागवत रेजीवाड गटविकास अधिकारी प. स. जिवती
◆ किचन शेड नसल्याने व शाळेची दुरावस्था झाल्याचे शालेय व्यवस्थापन समिती व मी पंचायत समिती स्तरावर वेळोवेळी माहिती सादर केली.
– रामकृष्ण निब्रड, मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंभेझरी