चांदा ब्लास्ट
जिल्ह्यात मानव – वन्यजीव संघर्ष वाढीस आला असून शहरात आज पुन्हा भर लोकवस्तीमध्ये अस्वलची दहशत निर्माण झाली आहे.
आज दि. ७ जुलै रोजी सकाळी ५ वाजता शहरातील तुकुम परिसरातील छत्रपती नगर येथील विद्या विहार कॉन्व्हेंट जवळ सकाळी फिरायला गेलेल्या प्रेमदास मा. रामटेके यांचेवर अस्वलीने जबर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
प्रेमदास रामटेके यांना शरीरावर गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सदर परिसर हा दाट लोकवस्तीचा असून बाजूलाच विद्या विहार कॉन्व्हेंट आहे. शेकडो विद्यार्थी या शाळेत येणे – जाणे करतात. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तात्काळ वनविभागाने या अस्वलाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.