जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जलजीवन मिशनचा आढावा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेचा, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.17) आढावा घेतला. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) प्रदीप बाराहाते, निलिमा मंडपे (जलसंधारण विभाग), संजय अष्टगी (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, सहायक प्रकल्प अधिकारी गिरीश पोळ उपस्थित होते.
जिल्ह्यातील नागरिकांना जलजीवन मिशन अंतर्गत 100 टक्के नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, ज्या योजना पूर्ण झाल्या असतील, त्यामधून पाणी सुरू होणे आावश्यक आहे. तरी सुध्दा भौतिकदृष्ट्या काही किरकोळ कारणाने सदर योजना रखडल्या असतील, तर त्या त्वरीत पूर्ण करून घ्या. महावितरणच्या कामामुळे पूर्ण न झालेल्या योजनांचा पाठपुरावा करावा. अर्धवट राहिलेल्या पाणी पुरवठा योजनांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतंत्र आढावा घ्यावा. त्याकरीता खनीज विकास मधून निधी देता येईल, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
यावेळी कार्यकारी अभियंता प्रदीप बाराहाते म्हणाले, ग्रामीण पाणी पुरवठा अंतर्गत 1684 योजना असून यापैकी 1005 योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 833 योजनांमधून पाणी सुरू आहे. डिसेंबर 2026 पर्यंत उर्वरीत सर्व योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.