ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकरी उतरले रस्त्यावर, आंदोलनाला तीव्र स्वरूप

आंदोलनाचा सहावा दिवस ; चार आंदोलकांची प्रकृती चिंताजनक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

तालुक्यातील शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ कडकडीत बंद

जिवती :- तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समितीतर्फे ७ डिसेंबर पासून तहसील समोर शेतीच्या पट्ट्यासह एकूण १३ मागण्या घेऊन सुरू असलेल्या अन्नत्याग आमरण उपोषणाच्या सहाव्या दिवशीही शासन, प्रशासनानी दखल घेतली नसल्याने मंगळवारी तालुक्यातील शेतकरी पेटून उठून रस्त्यावर उतरले. मंगळवारी तालुक्यातील शाळा, महाविद्यालय व सर्व बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या असून जो पर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत सर्वच कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय सर्व तालुका वासीयांनी घेतला आहे.
सहाव्या दिवशी आंदोलनाला तालुक्यातील व्यापारी संघटना, अंगणवाडी सेविका संघटना, आशावर्कर संघटना, ऑटो चालक मालक संघटना, शाळा, विद्यालय, महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध सामाजिक संघटना, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांचा जाहीर पाठिंबा मिळाला असून मागण्या मान्य नाही झाल्यास तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन तालुक्याला जोडनाऱ्या मुख्य रस्ते बंद पाडून कोणत्याही पक्षांच्या राजकीय नेत्यांना तसेच सर्व शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच महामंडळच्या बसेसला सुध्दा तालुक्यात बंदी घालण्यात येईल असे तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठरविले आहे. आंदोलन चिघळल्यास होणाऱ्या परिणामास शासन प्रशासनच जबाबदार असेल असाही इशारा उपस्थित शेतकरी बांधवांनी दिला.
उपोषणकर्त्यांची तब्येत दिसेंदिवस खालावत आहे. लक्ष्मण मंगाम या उपोषणकर्त्याला उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले. त्यामुळे उपोषणकर्ते सुदाम राठोड, मुकेश चव्हाण, विनोद पवार, प्रेम चव्हाण, यांची प्रकृती चिंताजनक सुग्रीव गोतावळे, विजय गोतावळे, दयानंद राठोड, शब्बीर जागीरदार,बालाजी वाघमारे यांनी आमच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार शासन प्रशासन राहील असे सांगितले.

– राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिनिधी म्हणून देवराव भोंगळे हे उपोषण स्थळी हजर झाले. त्यांनी उपोषण कर्त्यांसोबत चर्चा केली आणि उपोषणस्थळावरून सुधीर मुनगंटीवार यांना फोन लावला असता सुधीर मुनगंटीवार यांनी उद्या किंवा परवा महसूल मंत्री, महसूल व वनविभागाच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासोबत उपोषणकर्ते यांच्या शिष्टमंडळासोबत शेतीच्या पट्यासह इतर महत्वाच्या विषयावर नागपूर येथे सभा लावण्याचे आश्वासित केले. मात्र जोपर्यंत मार्ग निघणार नाही तोपर्यंत उपोषणकर्ते आंदोलनावर ठाम आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये