वारंवार विज पुरवठा खंडितमुळे “करंजी”कर वैतागले
चोरीचे प्रमाण वाढले : विद्युत उपकरने ठरताहेत निकामी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी राजेश डोंगरे
गोंडपिपरी :- तालुक्यातील करंजी येथील ग्रामस्थ विद्युत पुरवठा विषयाला घेऊन प्रचंड वैतागले आहेत. पाऊस आणि वारा नसताना देखील गावातील विद्युत पुरवठा वारंवार बंद होतो. यामुळे घरातील यांत्रिक उपकरणे देखील आता निकामी ठरू लागली आहेत. गावात चोरीचे प्रमाण वाढले आहेत.यामुळे नियमित आणि सुरडीत विद्युत पुरवठा ठेवावा, अशी मागणी करंजी गावातील सामाजिक कार्यकर्त्याच्या शिष्टमंडळाने विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली आहे.
करंजी हे ५००० लोकसंख्येचे गाव. या गावातील नागरिक विद्युत वितरण कंपनीच्या आडमुट धोरणामुळे प्रचंड वैतागले आहेत. गावात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो.अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेत गावात चोरीचे प्रमाण वाढले आहे.यांत्रिक उपकरण देखील निकामी ठरू लागले आहेत. शाळकरी विद्यार्थी त्रस्त आहेत. कृषी पंप चालक देखील मेटाकूटीस आले आहेत. सद्या पावसाचे दिवस आहेत. गावासभोवताल तलाव आणि शेती आहे. यामुळे गावात नियमित आणि सुरळीत विद्युत पुरवठा असण्याची गरज आहे.
दरम्यान, गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली आहे. या शिष्टमंडळामध्ये माजी उपसरपंच सारनाथ बक्षी, ग्रा.पं. च्या प्रशासकीय समितीचे सदस्य समीर निमगडे, निखिल बामणे, सामाजिक कार्यकर्ते राकेश चापले, सागर अल्लूरवार, वैभव निमगडे, बादल देऊरमल्ले आदींचा समावेश होता.
वाढीव पोलची गरज
गावात मानवी वस्ती वाढू लागली आहे.त्यामुळे गावामध्ये २० ते २५ नव्या पोलची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांची मागणी लक्षात घेता नव्या पोलची मागणी जोर धरत आहे. यावेळी शिष्टमंडळाने ही मागणी रेटून धरली आहे.
जोडरस्त्यावर स्ट्रीट लाईटची आवश्यकता
करंजी आणि जोगापूर या गावांना जोडणाऱ्या पोंभुर्णा पांदन रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. या रस्त्यावर नियमित वर्दळ आणि यातायत असते. शाळकरी विध्यार्थी या मार्गाने ये – जा करतात. शेतकरी रात्री – बे रात्री या मार्गे ये जा करतात. यामुळे या ठिकाणी १० ते १२ पोल उभारून “स्ट्रीट लाईटची” सुविधा करून देण्याची मागणी देखील यावेळी शिष्टमंडळाने केली.



