ताज्या घडामोडी

32 वर्षांनी त्यांनी पुन्हा अनुभवले बालपणाचे ते रम्य दिवस

तत्कालीन शिक्षकांचाही लाभला प्रेमळ सहवास

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

शालेय परिसरात तब्बल ३२ वर्षांनी आपल्या त्याच मित्रांचा सहवास त्याच गोड आठवणीत रंगलेल्या गप्पा आणि दुग्धशर्करा योग म्हणजे त्या काळात शिकविणाऱ्या त्यातील काही शिक्षकांचा पुन्हा एकदा प्रेमळ आशिर्वाद ही कुठल्याही चित्रपटाची कथा नाही तर हा अनुभव प्राप्त झाला जिल्हा परिषद (मा.शा) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजुरा येथील १९९०-९१ च्या दहाव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना.

जि. प. हायस्कूलच्या १९९०-९१ मधे दहावीत असलेल्या वर्गमित्रंनी आपले ते रम्य दिवस पुन्हा एकदा जगण्याचा निश्चय केला. शहरात अजुनही स्थाईक असलेल्या वर्गमित्रांनी शाळेच्या मुख्याध्यापकांनी भेट घेऊन आपली इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी तत्काळ सर्व माजी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वातावरणात पुनश्च स्वागत करण्याचे त्यांना तीच जुनी अनुभूती देण्याचे स्विकार करून सर्व वर्गमित्रांना शाळेत सहर्ष येण्याचे आमंत्रण दिले. पुढची प्रक्रिया त्या काळातील शहरात असलेल्या शिक्षकांशी संपर्क करून त्यांना आमंत्रित करण्याची आणि तत्कालीन शिक्षकांनाही आपल्या विद्यार्थांनी केलेली प्रगती बघण्याची असलेली उत्सुकता स्वस्थ बसु देत नसल्याने त्यांनीही आपल्या मुलांना भेटण्याची तीच ओढ असल्याचे आपल्या उपस्थितीने दाखवुन दिले.

अस्लम अली ने आपल्या वर्गमित्रंचा एक व्हॉट्स ॲप गृप तयार केला होता त्यात सामील इतर मित्रांनी आपापल्या संपर्कातील इतर मित्रांना गृप मधे सामिल करून घेत जणु ऑनलाईन वर्ग आधीच तयार केला होता आणि आता सर्वांना प्रतीक्षा होती ती जुन्या ऑफलाईन भेटीची जी त्यांना मिळाली १० सप्टेंबर रोजी. विद्यार्थ्यांच्या ह्या एकात्रिकरणाच्या सोहळ्याचे अध्यक्षस्थान जि. प. (मा.शा) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजुराचे मुख्याध्यापक किशोर उईके तर सत्कारमुर्ती म्हणून प्रा.राम वैरागडे, श्रीमती रजनी ठाकूरवार व बि. यु. दुर्गे मंचावर उपस्थित होतें.

जगात आपल्याला कितीही मान सन्मान व पुरस्कार मिळाले तरीही आपल्या यशाचे खरे चीज होते ते आपल्या आप्तांनी पाठीवर दिलेल्या कौतुकाच्या थापेनेच हीच अनुभूती राजुऱ्याचा सुपुत्र व आता अवघ्या महाराष्ट्रात साहित्यिक म्हणून परिचित असलेल्या डॉ. प्रा. अनंता सुर ह्या मित्राला जरी त्याला साहित्यातील ९० पुरस्कार मिळाले, त्याची २० पुस्तके प्रकाशित झाली त्याचा हृदय सत्कार जेव्हा त्याच्याच वर्गमित्रांनी आपल्या शिक्षकांच्या साक्षीने केला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील ते भाव शब्दातीतच.

सोहळ्याच्या सुरुवातीलाच जे गुरुवर्य व वर्गमित्र ह्या जगातून सर्वांना कायमचे सोडून गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर आपल्या गुरुजणांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देवून सत्कार करण्यात आला, प्रा. वैरागडे सर यांनी आपल्या आठवणीतील सर्वोत्तम व जिव्हाळ्याने भरलेला एकत्रीकरण सोहळा असल्याचे मत व्यक्त केले तर रजनी ठाकूरवार मॅडम यांनी आपल्या प्रतिक्रिया काव्यस्वरुपात अतिशय भावूक होवून व्यक्त केल्या. बि. यु. दुर्गे सरांनी स्पष्टवक्ते व आदर्शव्यक्तीमत्व बनण्याचे आवाहन केले.

उपस्थित विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्या रम्य दिवसांच्या आठवणी पुन्हा एकदा जागृत करून सर्वांना बालपणात नेले. अस्लम अलीने गृपची महती सांगीतली तर सत्काराला उत्तर देतांना डॉ. प्रा. अनंता सुर यांनी आपला संघर्ष, जिद्द, चिकाटी व मित्रांप्रती प्रेम व्यक्त केले. नेल्लूर, बुलढाणा, भोपाळ, पुणे, नागपूर, चंद्रपूर, उमरेड, ब्रम्हपुरी येथुन सर्व मित्र परिवार गोळा झाला. ३२वर्षानंतर काही मित्र पहिल्यांदा भेटले ती उत्सुकता, तो आनंद अवर्णनीय होता.

सोहळ्याच्या दुसऱ्या सत्रात चुनाळा रेस्ट हाऊस येथे संगीत रजनी, सांस्कृतिक कार्यक्रम व भोजनाची व्यवस्था झाली. आठवण म्हणून सर्व मित्रांना एक-एक स्मतीचिन्ह देण्यात आले. सर्व यारों के यारांचे पाय संगीतावर थिरकले, मनसोक्त नृत्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. गेट टुगेदर चे बहारदार सुत्रसंचालन संदीप कोंडेकर यांनी तर आभार सतीश शिंदे यांनी मानले. परगावातून आलेल्या सर्व मित्रमंडळींनी एकत्रीकरण सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल राजुरा चमूचे मनभरुन कौतूक केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये