भद्रावती तालुका दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना भरीव आर्थिक मदत द्या
शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाची मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
तालुक्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षीच शेत पिकांसह इतर नुकसान फार मोठया प्रमाणात होत आहे. हिच परिस्थिती या वर्षीच्या शेत हंगामात निर्माण झाल्याने खरिप पिकांची पुरी वाट लागली आहे. यामुळे भद्रावती तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना भरीव आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी
शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन स्थानिक तहसीलदारांना नुकतेच देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख तथा नगरसेवक नरेंद्र पढाल , चिंचोलीचे माजी सरपंच तथा ग्रा.पं. सदस्य मनोहर श्रीरामे, माजी युवा सेनाप्रमुख उमेश काकडे आणि अँड. महेश ठेंगणे यांच्यासह अनेक शेतकरी बांधव
सदर निवेदनात असे नमुद करण्यात आले की, भद्रावती तालुक्यातील पुरग्रस्त व अतीवृष्टी क्षेत्रातील शेतमालाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे. जंगली जनावरांमुळे शेत पिकांच्या नुकसानीची भरपाई करण्यात यावी. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी व मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या परिवाराला तात्काळ मदत करण्यात यावी.
या वर्षी झालेल्या अतीवृष्टीमुळे भद्रावती तालुक्यातील पाटाळा, पळसगाव, मनगाव, राळेगाव, माजरी, कोंढा, पिपरी, तेलवासा, ढोरवासा, घोनाड, कोची, चेकतिरवंजा, तिरवंजा (मो.), जंगल भागातील गावे व इतर गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पुरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे झालेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके पुरामुळे खरडुन गेली. यामुळे शेतमालाचे पुर्णत: नुकसान झाले आहे. परंतु अजुनपर्यंत त्यांच्या शेतीचे पंचनामे शासनामार्फत करण्यात आलेले नसुन मंडळ अधिकारी, तलाठी यांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनामार्फत मिळणारी नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत असुन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
भद्रावती तालुक्यातील बहुतेक गावे जंगल क्षेत्राला लागलेली असून तालुक्यातील शेतकऱ्यांना जंगली जनावरांचा खुप त्रास सहन करावा लागतो. जंगली जनावरे शेतात घुसून शेतमालाची नासधुस करतात . तसेच शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान करतात. त्यामुळे त्यांना जंगली जनावरांपासुन संरक्षण मिळणे. त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी.
तालुक्यातील शेती क्षेत्र जंगल भागाला लागुन असल्यामुळे वन्य प्राण्यांचा धोका इथल्या शेतकऱ्यांना नेहमीच सहन करावा लागतो. शेतात काम करतांना, जनावरांना चारायला नेतांना अथवा शेतात ये-जा करतांना वन्य प्राण्याचा धोका असतो. या भागात वन्य प्राण्यांनी शेतकऱ्यांना जखमी केले. शेतकरी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पाडला. अशा घटना नेहमीच घडतांना दिसुन येतात. परंतु त्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असुन मोठ्या विवंचनेत जीव मुठीत घेवुन त्याला शेती करावी लागत आहे. त्यामुळे वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी व मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला तात्काळ मदत मिळणे गरजेचे आहे.
भद्रावती तालुक्यातील पाटाळा, पळसगाव, मनगाव, राळेगाव, माजरी, कोंढा, पिपरी, तेलवासा, ढोरवासा, घोनाड, कोची, चेकतिरवंजा, तिरवंजा (मो.), जंगल भागातील गावे व इतर गावातील शेत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे. जंगली जनावरांमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी व मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या परिवाराला तात्काळ मदत करण्यात यावी. असेही निवेदनात शेवटी नमुद करण्यात आले आहे.