विद्यार्थ्यांनी उत्तोमतम साहित्य कृतींची जीवन व्यवहाराशी सांगड घालावी – प्रा सचिन सावरकर
आनंद निकेतन शाळेत "लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला" नाविन्यपूर्ण उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
आजच्या विद्यार्थ्यांचा भाषिक आवाका लक्षात घेऊन त्यांना समजेल – अशा पद्धतीने लेखकांनी लेखन केल्यास नवीन पिढीमध्ये वाचनाचे संस्कार रुजून त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण होईल असे प्रतिपादन पुस्तक दोस्ती चळवळीचे प्रणेते लेखक प्रा सचिन सावरकर यांनी केले.
सेवाग्रामच्या बापू कुटी परिसरातील आनंद निकेतन शाळेत “लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला” हा उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमात प्रा सावरकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका जया गावंडे या होत्या. लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका व लेखक प्रा सचिन सावरकर यांचा परिचय किशोर अमृतकर यांनी करून दिला. पुढे बोलताना प्रा सावरकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन उत्तम उत्तम साहित्य कृतीं चे वाचन करून जीवन व्यवहाराशी त्या साहित्य कृतींची सांगड घालून त्याचे समर्थपणे उपयोजन कसेकरावे याची सोप्या भाषेत विवेचन केले.
याप्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी दररोज चांगल्या पुस्तकाचे पाच पाने वाचण्याचा संकल्प केला. यावेळी प्रा सावरकर यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या “आयुष्याचा मृदगंध” या पुस्तकावर परिसंवाद आयोजित केला गेला. परिसंवादात तृप्ती शिंगारे, मोनाली होनाडे यांनी पुस्तकावर विचार मांडले. याप्रसंगी शाळेच्या ग्रंथालयाला प्रा सावरकर यांनी आयुष्याचा मृदगंध या पुस्तकाच्या प्रती भेट दिल्या.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मुख्याध्यापिका जया गावंडे यांनी प्रा सचिन सावरकर यांचे आयुष्याचा मृदगंध हे पुस्तक जीवनाला दिशा देणारे असून कोणत्याही कठीण प्रसंगात जगण्याला बळ प्राप्त करून देणारे आहे असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन गौरी चांडक यांनी तर आभार गौरव ताम गाडगे यांनी मानले. या आनंददायी उपक्रमाच्या आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.