चंद्रपूरमधील रेल्वे ओव्हर ब्रिज अपघातात दोषींवर कारवाईची मागणी
चंद्रपूरमधील रेल्वे ओव्हर ब्रिज अपघातात दोषींवर कारवाईची मागणी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर शहरातील बल्लारशाह बायपास महामार्गावरील अष्टभूजा बाबूपेठ मध्यभागी असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम मागील पाच ते सहा वर्षांपासून रखडले आहे. यामुळे या ठिकाणी अनेक अपघात घडून अनेक लोकांचे बळी गेले आहेत. नुकतेच दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात चार निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. याकडे फलक लावून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे.
या अपघातांमध्ये बांधकाम विभाग आणि टोल कंपनीला दोषी ठरवले जात आहे. आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी अपघाताबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, सदर ब्रिजचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी वरोरा चंद्रपूर बल्लारपूर टोल रोड (WCBTRL) कंपनीची आहे. मात्र, कंपनीने या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. बांधकाम विभागाने देखील कंपनीला वेळेवर कारवाई केली नाही.
या विरोधात आम आदमी पार्टीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि रामनगर पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे. मात्र, अद्याप दोषींवर कारवाई झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीकडून प्रशासनासमोर खालील मागण्या ठेवण्यात आल्या आहेत:
* दोषींवर भादवि कलम 304, 308 अनुसार कायदेशीर कारवाई करावी.
* अपघातात मृत्यू पावलेल्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये तर जखमींना पाच लाख रुपये आर्थिक नुकसान भरपाई द्यावी.
* सदर ब्रिजचे काम एक महिन्याच्या आत तात्काळ सुरू करावे.
* सदर ब्रिजपासून कामगार चौक पर्यंत सर्विस रोड द्यावा.
* पोभूर्णा मार्गे येणारी विरुद्ध दिशेची जड वाहतूक तात्काळ थांबवावी.
* आंबेडकर चौक या ठिकाणी मोठे स्क्वेअर हाय मास्ट लाईट बसवावे.
कुडे यांनी सांगितले की, या मागण्या 10 दिवसांत पूर्ण न झाल्यास किंवा लेखी स्वरूपात पत्र न दिल्यास आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. होणारे वारंवार अपघात टाळण्यासाठी आणि ब्रिजचे काम तात्काळ करण्यासाठी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी येणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधून घेण्याकरिता आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी फलक हातात घेऊन उपस्थित राहतील.
यावेळी आप चे नेते सुनील नेते, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, जिल्हा कामगार संघटन अध्यक्ष सूरज ठाकरे, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, जिल्हा संघटन मंत्री नागेश्वर गंडलेवार /भीवराजजी सोनी, जिल्हा विधी सल्लागार ॲड. किशोर पुसलवार, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, बल्लारपूर शहर अध्यक्ष रवि पुपलवार, भद्रावती शहर अध्यक्ष सूरज शाह, घुगुस शहर अध्यक्ष अमित बोरकर, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, महानगर महासचिव ॲड. तबससूम शेख, महानगर सह संघटन मंत्री सिकंदर सागोरे, महानगर ओबीसी आघाडी अध्यक्ष प्रशांत धानोरकर, महानगर कोषाध्यक्ष स्वप्नील घाघरगुंडे, सुनील सद्भैय्या, आसिफ शेख, अफजल अली इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.