स्वातंत्र्य फुकट मिळालेले नाही याची जाणीव असणे आवश्यक – कॅप्टन मोहन गुजरकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वायगांव : ‘स्वातंत्र्य लढ्यात अगणित स्वातंत्र्य सैनिक व क्रांतिकारकांना आपले बलिदान द्यावे लागले. ‘देशाकरीता सर्वकाही’ या भावनेतून लढा दिल्यामुळेच आपण स्वतंत्र झालोत. आज हेच स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आपले सर्वाचे कर्तव्य असून नव्या पिढीमध्ये देशप्रेम, कर्तव्यदक्षता, समर्पण, प्रामाणिकता यासारखे मुल्य रुजविण्याची गरज आहे. याकरीता नवपिढीच्या मनात स्वातंत्र्य फुकट मिळालेले नाही, याची जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्थानिक यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित 73 व्या ‘स्वातंत्र्य दिन’ सोहळ्यात प्रभारी प्राचार्य कॅप्टन मोहन गुजरकर यांनी मार्गदर्शन करताना केले.
स्वातंत्र्य दिन सोहळ्याची सुरुवात स्वातंत्र्य सेनानींना पुष्पचक्र प्रदान करून झाली. यावेळी प्राचार्य कॅप्टन मोहन गुजरकर यांनी ध्वजारोहण केले. मंचावर यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विरेंद्र बैस, यशवंत विद्यालयाच्या माजी प्राचार्य साधना घोडखांदे, शिक्षक प्रतिनिधी राजेन्र्द बोबडे व क्रिडा शिक्षक प्रविण सातोकर उपस्थित होते.
‘झेंडा अमुचा प्रिय देशाचा फडकत वरी महान……’ या गीताने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर बॅण्ड पथकाच्या तालावर व लेझीम च्या नृत्यावर वायगांव या गावात प्रभातफेरी निघाली. दरवर्षीच्या प्रथेनुसार यशवंत विद्यालयाच्या प्रभातफेरीने ग्रामपंचायतसह, दुध डेअरी, झेंडा चौक, उपसरपंच चौक व क्रिडा चौकात ध्वजारोहण पार पडले.
या स्वातंत्र्य दिनाचे आकर्षण म्हणजे प्रभात फेरीत राष्ट्रीय थोर स्त्री पुरुषांच्या वेशभूषा, बैंड पथक, लेझीम पथक, राष्ट्रीय छात्र सेनेची कवायत, स्काऊटस व गाईड्सचा मार्च पास्ट, उर्जा क्लबची झाकी व इंटरॅक्ट क्लब ची देशभक्तीपर गाणी होती. वायगांव ग्रामवासीयांनी शाळेच्या नाविन्यपूर्ण प्रभातफेरीचे स्वागत केले.
यशस्वीतेकरीता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग वृंदानी मदत अथक प्रयत्न केले.