गांव चलो अभियान प्रवास दौराप्रसंगी हंसराज अहीर यांचा लोणी ग्रामवसीयांसोबत संवाद
ज्येष्ठाचा सत्कार, गृहभेटी व चावडीवर नागरीकांशी चर्चा

चांदा ब्लास्ट
भाजपाच्या गांव चलो अभियानाअंतर्गत दि. 10 फेब्रुवारी रोजी पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आर्णी तालुक्यातील लोणी या गांवास प्रवास करीत नागरीकांशी संवाद साधला. प्रारंभी श्री. मनिष पाटील यांच्या सोबत माजी खासदार स्व. उत्तमराव पाटील वडील भाऊसाहेब पाटील, मातोश्री स्व. वत्सलाबाई पाटील यांच्या स्मृतिस्थळास भेट देवून श्रध्दांजली वाहिली.
यावेळी लोणी वासियांनी अहीर यांचे वाजत गाजत उत्स्फुर्त स्वागत केले. यावेळी येथील मंदीरात शेकडो लोकांच्या उपस्थितीत पुजन व आरती केली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, एन.टी जाधव विपीन राठोड, किशोर बावने, किसन राठोड, दिलीप मादेसवार, विशाल देशमुख, बाळासाहेब चावरे, रमेश चौव्हाण, राजेश माहेश्वरी, सुरेश चिल्लरवार, प्रमोद आडे, भाऊसाहेब आत्रे यांची उपस्थिती होती. ग्रामसभेमध्ये हंसराज अहीर यांनी केंद्र व राज्य सरकारी योजना व कृषी व शेतकऱ्यांच्या हितासाठी मोदीजींनी केलेल्या अभूतपुर्व कार्याची माहिती दिली.
प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदीजींचे 10 वर्षातील कार्य ग्रामिण विकास व शेतकऱ्यांना समर्पित असल्याचे सांगितले. गरीब, शेतकरी महिला व युवकांना सन्मान मिळवून देण्यासाठी ते कार्य करीत असल्याचे सांगितले.
मागील कार्यकाळात लोणीवासीयांना सभागृह, रस्ते व अन्य सुविधा दिल्याबद्दल ग्रामस्थांनी हंसराज अहीर यांचा सन्मान केला. यावेळी येथील 89 वर्षीय गांधीवादी व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. नंदपूरे वयोवृध्द श्री. चौधरी व अन्य जेष्ठ नागरीकांचा अहीर यांनी सत्कार केला. शेतकरी बांधवांनी सीसीआय व नाफेडद्वारा कापूस व सोयाबीन खरेदी करण्यात यावी अशी सुचना केली. आपण याबाबत प्रयत्नरत असल्याचे उपस्थितांनी सागितले.
या भेटीत अहीर यांनी बिरसा मुंडा व्यायामशाळेस भेट देवून उपस्थित युवकांशी विविध विषयावर चर्चा केली. देवीदासजी मुंदे वृध्द शेतकरी, माधवराव वायकर सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या गृहभेटी घेतल्या. माजी बुथ प्रमुख स्व. रमेश माहूरे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले. लाईनमन सोनटक्के यांच्या कुटूंबियाशी चर्चा केली. आजारी आतिष वैद्य यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. चावडीवर नागरीकांशी रात्री उशीरापर्यंत चर्चा केली व भाजपाचे मिशन महाविजय 2024 चे ध्येय साकार करण्याचे आवाहन केले. त्यानंतर एन.टी. जाधव यांच्या शेतामध्ये मुक्काम करून अहीर यांनी चंद्रपूर करीता प्रस्थान केले.