भारतीय जनता पक्ष राष्ट्रसेवा, जनसेवा आणि विकास यांना सर्वोच्च प्राधान्य देणारा विचार — आ. किशोर जोरगेवार
लालपेठ येथील असंख्य युवकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

चांदा ब्लास्ट
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेला अंत्योदयाचा मंत्र, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे राष्ट्रप्रेम आणि असंख्य कार्यकर्त्यांचे समर्पण या पायावर भारतीय जनता पक्ष उभा असून भारतीय जनता पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नसून राष्ट्रसेवा, जनसेवा आणि विकास यांना सर्वोच्च प्राधान्य देणारा एक विचार आहे. हाच विचार पक्षात नव्याने सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी समाजासमोर न्यावा, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
गुरुवारी लालपेठ येथे भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, महामंत्री मनोज पाल, श्याम कनकम, सविता दंढारे, नामदेव डाहुले, दशरथसिंह ठाकूर, बलराम डोडाणी, आशिष मासिरकर, राम जंगम, गिरीश गोगुलवार, देवा कुंटा आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आज लालपेठ परिसरात आयोजित करण्यात आलेला हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पाहून अत्यंत आनंद होत आहे. मोठ्या संख्येने युवकांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला आहे. ही केवळ पक्षाची ताकद नसून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशादायी बाब आहे.
आज देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगात नवी उंची गाठत आहे. गरीब कल्याण, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत यांसारख्या अनेक योजनांमुळे देशातील प्रत्येक नागरिक विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहे.
तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विकासाला नवी गती मिळाली आहे. सामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय, पारदर्शक प्रशासन आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे जनतेचा भारतीय जनता पक्षावरील विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे.
आज जे युवक पक्षात प्रवेश करत आहेत, त्यांनी केवळ राजकारणासाठी नव्हे तर समाजकारणासाठी, राष्ट्रनिर्मितीसाठी आणि जनसेवेसाठी हा निर्णय घेतला आहे. तुमच्या रूपाने भारतीय जनता पक्षाला नवी ऊर्जा, नवे विचार आणि नवे नेतृत्व मिळणार आहे.चंद्रपूर शहराच्या विकासासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे कार्य करत आहोत. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, क्रीडा आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी अनेक विकासकामे सुरू आहेत. आगामी काळातही चंद्रपूरला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे.
आपण सर्वांनी पक्षाची विचारधारा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचवण्यासाठी कार्य करावे आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.यानंतर पक्षाचा दुपट्टा परिधान करून सर्व नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



