चांदली बुज ग्रामपंचायतीतील अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
नागरिक त्रस्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चांदली बुज ग्रामपंचायत हद्दीत मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर वाढत्या अतिक्रमणामुळे ग्रामस्थांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. घरबांधकामासाठी लागणारे वाळू, गिट्टी, विटा आदी साहित्य थेट रस्त्यावर टाकण्यात येत असल्याने नागरिकांची ये-जा धोकादायक व त्रासदायक बनली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरच बैलबंडी उभी करून बैल बांधले जातात व बैलासाठी कुडदानटाके सुद्धा रस्त्यावर ठेवत असल्यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे एकदरीत रस्त्यावर अतिक्रमण असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.
या गंभीर समस्येबाबत तंटामुक्ती माजी अध्यक्ष राकेश गुंडावार यांनी ग्रामपंचायतीला तीन वेळा निवेदन देऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती. मात्र, ग्रामपंचायतीकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासन कोणतेही ठोस पाऊल उचलत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असल्यामुळे रस्ते अरुंद होत चालले आहेत. त्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून दुचाकी व चारचाकी वाहनधारकांनाही वाहन काढताना अडचणी निर्माण होत आहेत. काही ठिकाणी तर आपत्कालीन परिस्थितीत वाहनांना मार्ग मिळणेही कठीण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायतीने तातडीने कारवाई करून रस्त्यांवरील अतिक्रमण हटवावे, नागरिकांना मोकळा व सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा, तसेच याकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील काळात आंदोलनाचा इशाराही राकेश गुंडावार यांनी दिला आहे.
वसंत गुंडावार ते अशोक पोरेड्डीवार याच्या घरासमोरील असलेल्या रस्त्यावर घरबांधकाम करिता लागणारे साहित्य रस्त्यावरच टाकले जातात तसेंच रस्त्यालगत असलेल्या नालीवर पक्के बांधकाम केले असल्यामुळे ये -जा करन्यासाठी अडथळा होत आहे
राकेश गुंडावार चांदली बुज, तंटामुक्ती माजी अध्यक्ष तथा सदस्य



