चंद्रपूर येथून वृद्ध महिला बेपत्ता; रेल्वे पोलिसांत मिसिंगची नोंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चंद्रपूर रेल्वे स्थानक परिसरातून ६५ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाणे वर्धा येथे मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, आशाताई तुळशिराम बरडे (वय ६५, रा. येरूर, पो. तडाळी, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) या दि. १८ मे रोजी सकाळी चंद्रपूर रेल्वे स्थानकावरून भुसावळ येथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी आल्या होत्या. ओखा-पुरी एक्सप्रेस ही रेल्वे सुटून गेल्यानंतर दुसऱ्या रेल्वेची प्रतीक्षा करत असताना त्या चुकून अन्य रेल्वेत बसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. नातेवाईकांनी विविध ठिकाणी शोध घेतला, मात्र त्या आढळून न आल्याने शितल सतिश गोवरदिवे यांनी रेल्वे पोलीस ठाणे वर्धा येथे लेखी तक्रार दाखल केली.
रेल्वे पोलिसांनी मिसिंग क्रमांक ०७/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
बेपत्ता महिलेचे वर्णन असे : वय अंदाजे ६५ वर्षे, रंग गोरा, उंची सुमारे ५ फूट, केस काळे डाय केलेले, अंगावर साडी असून डाव्या हाताजवळ ऑपरेशनची जखम आहे. त्यांच्या जवळ हँडबॅग तसेच काही सोन्याचे दागिने असल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.
सदर महिलेबाबत कोणाला माहिती मिळाल्यास जवळच्या रेल्वे पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.



