ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आवश्यक उपायोजना करुन वाहतूक व्यवस्था मजबुत करा – आ. किशोर जोरगेवार

पोलिस अधिक्षकांची भेट घेत सुचना

चांदा ब्लास्ट

शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडी, विस्कळीत ट्राफिक व्यवस्था तसेच सुसाट वेगाने दुचाकी चालविणार्या युवकांमुळे निर्माण होत असलेल्या धोकादायक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षक आयुष नोपानी यांची भेट घेत विविध महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थेत तातडीने सुधारणा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

           आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरातील ट्राफिक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी १०० अतिरिक्त होमगार्डची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या महत्त्वाच्या चौकांमध्ये ट्राफिक सिग्नल बसविण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

रात्रीच्या वेळी होणारे अपघात कमी करण्यासाठी ट्रान्सपोर्टच्या वाहनांवर रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक करण्यात यावे, वाहतूक व्यवस्थेचा नियमित आढावा घेण्यासाठी ‘दिशा समिती’च्या नियमित बैठका घेण्यात याव्यात तसेच ट्रान्सपोर्ट धारकांची स्वतंत्र बैठक आयोजित करून त्यांच्या अडचणी व जबाबदार्यांबाबत चर्चा करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी यावेळी पोलिस अधिक्षकांना केली.

  वाहन चालक मद्यप्राशन करून वाहन चालवत आहेत का, याची तपासणी करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी अल्कोहोल तपासणी यंत्र बसविण्यात यावीत. तसेच ट्रान्सपोर्टमधील वाहन चालकांचीही रोज कर्तव्यावर येताना व जाताना अल्कोहोल तपासणी करण्यात यावी, असे निर्देशही आमदार जोरगेवार यांनी दिले.

          याशिवाय रस्त्याच्या कडेला उभे राहणार्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, रस्त्यांवर योग्य दिशादर्शक फलक व सेफ्टी पट्टे करण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला केल्या. खासगी बसेसच्या व्यवस्थेबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. खासगी बसेससाठी नागपूर रोड व मूल रोड येथे स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात यावी तसेच खासगी बसेसचे अनावश्यक थांबे कमी करण्यात यावेत, जेणेकरून शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

तसेच सुसाट वेगाने दुचाकी चालविणार्या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबवून कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, वारंवार नियम तोडणार्यांवर कडक कारवाई करावी तसेच शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढवावी, अश्या सूचना यावेळी त्यांनी केल्या आहे.

            नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थेमध्ये शिस्त व नियंत्रण निर्माण करणे अत्यंत आवश्यक असून प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, असेही आ. किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. यावेळी वाहतुक शाखेचे पोलिस निरिक्षक प्रविण कुमार पाठील, भारतीय जनता पार्टीचे बलराम डोडाणी आदिंची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये