शहरातील वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी रिंगरोड आणि उड्डाणपूलाची गरज _ आ. जोरगेवार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली मागणी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अवजड वाहनांचा वाढता ताण आणि सातत्याने घडणारे भीषण अपघात रोखण्यासाठी ‘पडोली फाटा ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय’ दरम्यान स्वतंत्र रिंगरोड बायपास रस्त्याची निर्मिती करण्यात यावी, तसेच वरोरा नाका उड्डाणपूल ते सावरकर चौक ते बंगाली कॅम्प येथील आर.ओ.बी. (MEL) रेल्वे लाईनपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात यावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. नागपूर येथे झालेल्या भेटीत आ. जोरगेवार यांनी चंद्रपूर शहरातील वाहतूक समस्यांची सविस्तर माहिती देत तातडीने रिंगरोडसाठी मंजुरी व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
यावेळी आ. जोरगेवार यांनी सांगितले की, चंद्रपूर हे कोळसा, लोहखनिज, सिमेंट आणि विविध औद्योगिक उपक्रमांमुळे राज्यातील अत्यंत महत्त्वाचे शहर बनले आहे. तसेच नागपूर, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली आणि शेजारील तेलंगणा राज्याला जोडणारे केंद्र असल्याने शहरातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते. मात्र NH-930 आणि NH-930D या राष्ट्रीय महामार्गांना शहराबाहेरून जोडणारा स्वतंत्र पर्यायी मार्ग नसल्याने सर्व वाहतूक शहराच्या मध्यवर्ती भागातूनच होत आहे.
सध्या बल्लारपूर बायपास रोड, बंगाली कॅम्प, रामनगर चौक, वरोरा नाका ते पडोली या मार्गांवर दररोज हजारो अवजड वाहने धावत असल्याने शहरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यामुळे शाळकरी विद्यार्थी, रुग्ण, नोकरदार वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्रस्तावित रिंगरोडमुळे कोळसा, लोखंड व इतर खनिज वाहतूक करणारी अवजड वाहने शहरात प्रवेश न करता थेट बाहेरील मार्गाने जाऊ शकतील. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अपघातांचे प्रमाण घटेल तसेच वायू व ध्वनी प्रदूषणातही मोठी घट होईल, असा विश्वास आ. जोरगेवार यांनी व्यक्त केला.
चंद्रपूर शहराच्या भविष्यातील दृष्टीने हा रिंगरोड अत्यंत महत्त्वाचा असून, या प्रकल्पाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी यावेळी आ. किशोर जोरगेवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
■ पडोली चौकात उड्डाणपूल उभारण्याची मागणी
चंद्रपूर शहराच्या विकासासाठी पडोली चौकात उड्डाणपूल उभारण्याची मागणीही आ. किशोर जोरगेवार यांनी यावेळी केली. वाढत्या वाहतुकीमुळे या चौकात सातत्याने कोंडी होत असून भविष्यातील गरजा लक्षात घेता पुलाचे बांधकाम अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वरोरा नाका उड्डाणपूल ते सावरकर चौक ते बंगाली कॅम्प येथील आर.ओ.बी. (MEL) रेल्वे लाईनपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
■ ८ लेन महामार्ग, ट्रान्सपोर्ट हब व उंच पुलाची मागणी
नागपूर राज्य महामार्ग (MSH-9) हा सध्या चार पदरी असून औद्योगिक विस्तार आणि वाढत्या मालवाहतुकीचा ताण लक्षात घेता या महामार्गाचे ६ किंवा ८ पदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी आ. जोरगेवार यांनी केली. याशिवाय केंद्रीय रस्ते निधी (CRF) अंतर्गत बागला चौक ते बल्लारपूर महामार्ग (NH-930D) पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच वर्धा नदीवरील धानोरा येथे अत्यावश्यक उंच पुलाचे बांधकाम मंजूर करून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. पावसाळ्यात या परिसरातील वाहतूक विस्कळीत होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, चंद्रपूर येथे आधुनिक आणि सर्वसमावेशक ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात यावा, अशी मागणीही आ. किशोर जोरगेवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.



