शाळेसाठी रोजच चिखलाची वाट
चिखलमय रस्त्यावरून विद्यार्थ्यांची व वृद्धांची कसरत
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील दमपूर मोहदा गावातील मुख्य रस्त्यासह सर्व अंतर्गत रस्त्याची होत असलेल्या सततधार पावसामुळे दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील चिखल व पाण्यामुळे नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. दरवर्षी येथील रस्त्यांची हिच अवस्था असते. शाळेत जाणारे विद्यार्थी घसरून पडण्याचा धोका आहे. यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. दमपूर मोहदा हे जवळपास ६ हजार लोकसंख्येचे गाव आहे. तरी मात्र मूलभूत सुविधांचा अभाव असलेल्या दमपूर मोहदाच्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. गावात मोठया प्रमाणात नाल्याच नसल्याने व ज्या आहेत त्याची पावसाळ्यापूर्वी संबंधित विभागाकडून साफसफाई केली नसल्याने घरांमधील सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे लवकर रस्ते खराब होत आहेत.
पावसाळ्यात पावसाच्या पाण्यासह सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने हे पाणी रस्त्यावर साचून नागरिकांना चालणे कठीण होत आहे.गावातील विद्यार्थ्यांना चिखल तुडवत आणि घाण पाण्यातून वाट काढत शाळेत जावे लागत आहे. चिखलमय रस्त्यावरून चालताना विद्यार्थ्यांना आणि वृद्ध पाय घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.