ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईके

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट

उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार

महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

चंद्रपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत ‘विकसीत भारताचे’ उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा ‘विकसीत महाराष्ट्र’ घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली.

पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच शेतक-यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत आता शेतमजुरांना सुध्दा सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2011 पुर्वीचे अतिक्रमण नियमानुकूल करून नागरिकांना जागेचा / घराचा मालकी हक्क देण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल.

राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेतून चंद्रपूर जिल्ह्यातील 209 महिलांना विविध योजनांद्वारे 100 टक्के अनुदानावर लाभ देण्यात येत आहे. निपुन भारत अभियानांतर्गत सुपर स्कूल घटकात चंद्रपूर जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. जिल्ह्यातील 11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना तर 4 उपकेंद्रांना राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे. सिकलसेल निर्मुलन मोहीम अंतर्गत रुग्णांची चाचणी करून उपचार करण्यात येत आहे. टी.बी. मुक्त पंचायत अंतर्गत जिल्ह्यातील 345 ग्राम पंचायती टी. मुक्त करण्यात आल्या आहेत. पी.एम. किसान योजनेंतर्गत जिल्ह्यातील 2 लक्ष 45 हजार 471 पात्र शेतक-यांना एकूण 148 कोटींचे वितरण करण्यात आल्याचे पालकमंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले. तसेच 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात स्वयंगणनेचा शुभारंभ होत असून नागरिकांनी यात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

नागरिकांना पट्टे वाटप व सन्मान : यावेळी चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने मंदा टेकाम, मारुती येरणे, मिरा नायडू, मिराबाई उराडे, शेहनाज जाकर अली यांना पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते पट्टे वाटप करण्यात आले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त ॲङ क्षमा बारसकर, निता पंत, ॲङ भाग्यश्री फाटक यांचा, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जिबगाव (ता.सावली), चिखली (ता. सावली), दुर्गापूर (ता. चंद्रपूर), भेजगाव (ता. मुल) या ग्रामपंचायतींचा, ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता प्रदीप बाराहाते, ग्राम महसूल अधिकारी नंदा हेपट, गुणवंत खेळाडू अश्विनी निमजे, हरमनसिंग मारबा, पंकज बेले यांचा पोलिस महासंचालकांचे बोधचिन्ह प्राप्त झालेले पोलिस निरीक्षक शिवाजी कदम, पोलिस उपनिरीक्षक विलास निकोडे, सुनील गौरकर आणि पोलिस हवालदार संदीप उपरे यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये