गरिबों के सम्मान में युवा वॉरियर्स मैदान में… हा भाव ठेवून काम करा _ आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे युवा वॉरियर्सना आवाहन
नागपूर येथील भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा वॉरियर्सच्या नव्या कार्यकारीणीचा पदग्रहण सोहळा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :- राजकारण म्हणजे फक्त निवडणूक नाही. निवडणूक हा १०० मार्कांच्या पेपरमध्ये आलेला पाच मार्कांचा प्रश्न आहे. उर्वरित ९५ टक्के प्रश्न हे लोकसेवेचे आहेत. आपल्याला लोकांची सेवा करायची आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यामुळे गरिबों के सम्मान में युवा वॉरियर्स मैदान में… ही भावना बाळगून स्वतःला कामात झोकून द्या, असे आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
नागपूर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा वॉरियर्सच्या नव्या कार्यकारीणीचा पदग्रहण सोहळा व युवा संमेलन आयोजित करण्यात आले. त्यावेळी आ. श्री. मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमाला नागपूर महानगर भाजपचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार सुधाकर कोहळे, श्रीकांत आगलावे, रितेश गावंडे, इशांत जैन, संजय अडसड, अथर्व त्रिवेदी, बादल राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती. आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नागपूर हे देशाला ऊर्जा देणारे केंद्र आहे. त्यामुळे युवा वॉरियर्सची येथील कार्यकारीणी जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर काम करेल असा विश्वास आहे. संपूर्ण देशासाठी आदर्श निर्माण करणारे कार्य करा, जेणेकरून भारतमातेने सुद्धा म्हटलं पाहिजे की… ‘हा आवाज माझ्या हृदयातून येतोय’. यातून भाजपमध्ये येणाऱ्या कोट्यवधी तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल.
आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘भाजप हा कधीही फक्त निवडणूक जिंकण्यासाठी स्थापन झालेला पक्ष नाही. ६ एप्रिल १९८० रोजी मुंबईत पक्षाची स्थापना झाली, त्याचा मी देखील साक्षीदार आहे. श्रद्धेय अटलजींचे शब्द स्मरणात आहे. ‘अंधेरा छटेगा सुरज निकलेगा, कमल खिलेगा’. पण आणखी दोन वाक्ये आहेत आणि ती देखील महत्त्वाची आहेत. ‘सत्ता हमारे लिये साधन है, साध्य नहीं है. सत्ता माध्यम, माध्य नहीं.’ विकसित भारतासोबत संस्कारित भारतासाठी आपल्या सर्वांना पक्षामध्ये १७ ते २५ वयाच्या तरुणांना संघटित करण्याची गरज आहे. युवा वॉरियर्सने १५४ वॉर्डांमध्ये प्रत्येकी ३० युवा वॉरियर्स तयार करण्याचा संकल्प केला आहे, तो स्तुत्य आहे. नवीन शक्ती पक्षाच्या पाठिशी उभी करायची आहे. ‘उठ तरुणा जागा हो… विकसित संस्कारित भारताचा धागा हो’, हा भाव निर्माण करायचा आहे.’
युवा वॉरियर्सच्या माध्यमातून तरुणाई जागवण्यासाठी कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले. युगपुरुष पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी पाच वर्षांचा नव्हे २०४७ च्या भारताचा विचार मांडला आहे. हा विचार पूर्ण करायचा असेल तर युवा वॉरियर्स जास्तीत जास्त सक्रीय करावे लागतील. तरच भयमुक्त भारताचे, भुकमुक्त भारताचे, बेरोरोजगारीमुक्त, दहशतमुक्त, समरसरता युक्त… शक्तीशाली भारताचं… गौरवशाली भारताचं… आत्मनिर्भर भारताचं… स्वप्न पूर्ण होणं शक्य आहे, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
आपण वेगाने पुढे जातोय. पण या वेगात पक्षातील परिवाराची भावना कमी होऊ द्यायची नाही. युवा वॉरियर्सला हे काम करावे लागेल, असेही ते म्हणाले. तरुणांच्या मनात राजकारणाबद्दल शंका असते. चांगले लोक राजकारणात आले नाही तर २०४७ च्या आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यामुळे इच्छाशक्तीच्या जोरावर युवा वॉरियर्स उभे झाले पाहिजे. युवा वॉरियर्सच्या माध्यमातून तरुणांना योग्य दिशा देण्याचे काम झाले पाहिजे. काम करताना पदाचा विचार महत्त्वाचा नाही. काम करण्याची भावना महत्त्वाची आहे. गरीब परिवारातील, झोपडीतील तरुणही आपल्यासोबत जोडा. हा तरुण युवा वॉरियर्सची शक्ती असेल. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील संकल्पावर शेकडो नेत्यांनी जे लक्ष्य ठेवून काम केले आहे, त्यासाठी काम करायचे आहे, असे आवाहनही आ. श्री. मुनगंटीवार यांनी केले.


