चतुरस्त्र सूर हरपला _ ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी _ आ. सुधीर मुनगंटीवार
भारतीय संस्कृतीच्या आकाशातील एक तेजस्वी तारा, चतुरस्त्र सूर आज कायमचा लोप पावला

चांदा ब्लास्ट
भारतीय संगीतविश्वाला आपल्या स्वरांनी मोहिनी घालणाऱ्या, सुरांच्या माध्यमातून कोट्यवधी रसिकांच्या आयुष्यात आनंद, वेदना आणि भावना जिवंत ठेवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी असून, भारतीय संस्कृतीच्या आकाशातील एक तेजस्वी तारा, चतुरस्त्र सूर आज कायमचा लोप पावला आहे, अशा अत्यंत भावुक शब्दांत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहे.
आशाताई म्हणजे केवळ एक गायिका नव्हत्या, तर त्या एक युग होत्या. एक अखंड वाहणारी सुरांची गंगा होत्या. त्यांच्या प्रत्येक गीतामध्ये भावना जिवंत व्हायच्या, प्रत्येक सुरामध्ये जीवनाचा स्पंदन असायचे . त्यांच्या आवाजाने अनेक पिढ्यांच्या सुख-दुःखांना शब्द आणि स्वर दिले. त्यामुळेच त्यांचे जाणे हे केवळ एका व्यक्तीचे निधन नसून, एका संपूर्ण सांस्कृतिक पर्वाचा अंत असल्याची जाणीव मनाला चटका लावणारी आहे, असे त्यांनी नमूद केले.
माझ्या सांस्कृतिक कार्य मंत्री पदाच्या कार्यकाळात आशाताईंना महाराष्ट्र भूषण हा सन्मान देण्यात आला हे मी माझे परमभाग्य समजतो.
सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून कार्य करत असताना आशाताईंशी अनेकदा भेटण्याचा योग आला होता. त्या प्रत्येक भेटीत त्यांचे साधेपण, आत्मीयता आणि कलेप्रती असलेली अविचल निष्ठा मनाला स्पर्शून जायची. त्यांच्याशी झालेल्या त्या संवादांच्या, त्या क्षणांच्या आठवणी आज मनाला खोलवर भिडत आहेत. आज त्या आठवणींचाच आधार घेऊन त्यांना स्मरावे लागत आहे, हीच सर्वात मोठी वेदना असल्याची भावना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
आशाताईंचा स्वर आज जरी शांत झाला असला, तरी त्यांचे गीत, त्यांची कला आणि त्यांचा अमर वारसा काळाच्या पलीकडे जिवंत राहील. त्यांच्या सुरांचा गंध हा युगानुयुगे भारतीयांच्या मनात दरवळत राहील. ईश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या अपार दुःखाचा सामना करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे .



