ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूक बदल ; पोलिसांचा कडक बंदोबस्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त वर्धा शहरात मोठ्या उत्साहात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांकडून चोख बंदोबस्त व वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.

जयंतीनिमित्त शहरात मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध उपक्रमांचे आयोजन होत असल्याने प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीचा ताण वाढणार आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काही मार्गांवर तात्पुरते बदल लागू केले आहेत.

14 एप्रिल रोजी विशेष वाहतूक नियोजन

दि. 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 5.00 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत काही मुख्य मार्गांवर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात जड वाहनांना शहरात प्रवेश बंद राहील. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, पोस्ट ऑफिस चौक, गांधी चौक, बापुराव देशमुख पुल आदी ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

बंद मार्ग व पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे :

बजाज चौक ते पोस्ट ऑफिस चौक हा मार्ग बंद राहील. यासाठी पर्यायी मार्ग म्हणून निर्मल बेकरी चौक – सोशलिस्ट चौक – आदित्य मेडिकल चौक – शिवाजी महाराज चौक – आष्टी चौक मार्गाचा वापर करावा.

गांधी पुतळा चौक ते डॉ. आंबेडकर पुतळा चौक हा मार्ग बंद राहील. यासाठी विश्राम भवन – आष्टी चौक – शिवाजी महाराज चौक – बजाज चौक या मार्गाने वाहतूक वळविण्यात येईल.

बापुराव देशमुख पुल ते डॉ. आंबेडकर पुतळा चौक मार्ग बंद राहील. पर्यायी मार्ग म्हणून इंदिरा गांधी पुल – शिवाजी महाराज चौक – बजाज चौक वापरावा.

आदित्य मेडिकल चौक ते पोस्ट ऑफिस चौक मार्गही बंद राहील. यासाठी निर्मल बेकरी चौक – सोशलिस्ट चौक – बजाज चौक – उडाणपुल मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांना आवाहन नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी संयम राखावा तसेच लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी. मौल्यवान वस्तू, मोबाईल फोन यांची सुरक्षितता राखावी. कोणतीही अडचण आल्यास तात्काळ 112 या पोलिस हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

वाहतूक पोलिसांनी सर्व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती पोलिस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा यांनी दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये