पोलिसांचा लाखोचा तिसरा डोळा ; तरीही काही दिसेना
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर!
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- जिवती शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी जिवती पोलीस विभागा मार्फत जिवती शहरातील तीन मुख्य चौकात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे आता केवळ शोभेची वस्तू झाले आहेत. शहरातील तीन महत्त्वपूर्ण ठिकाणी लावलेल्या नऊ कॅमेऱ्यापैकी एकही कॅमेरा सध्या कार्यरत नाही पोलीस विभागाकडून हे कॅमेरे लावण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला परंतु याचा उपयोग कधीच कुणालाही झाला नाही. पोलीस विभागाच्या वतीने शहरातील वीर बाबुराव शेडमाके चौक व बिरसा मुंडा चौक तसेच बस स्थानक परिसरातील चौकात हे कॅमेरे लावण्यात आले होते. या कामासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला तेव्हा त्या कॅमेऱ्याची देखभाल दुरुस्तीची व्यवस्था ही करण्यात आली व या कॅमेराचा नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आला होता.
या कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहरातील मुख्य चौकावर तिसऱ्या डोळ्यातून लक्ष ठेवणे सुरू झाले होते.व पोलीस प्रशासनाला आरोपींचा शोध घेण्यात मोलाची मदत होऊ लागली होती. परंतु सध्या देखभाल दुरुस्ती अभावी हे कॅमेरे शोभेची वस्तू झाले आहेत. आता नादुरुस्त असलेल्या कॅमेऱ्याकडे कडे कुणी लक्षही द्यायला तयार नाही. पोलीस विभागाने नामवंत कंपनीचे कॅमेरे खरेदी केले असताना काही महिन्यातच कॅमेरे कसे काय बंद झाले हा संशोधनाचा विषय आहे.त्यामुळे या कॅमेऱ्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लागल्यानंतर गुन्हेगारांना व अवैध धंदे करणाऱ्यांना वटणीवर आणण्यात पोलीस प्रशासनाला मोठे यश येईल असे वाटले होते, परंतु आता हे कॅमेरेच बंद झाल्याने गुन्हेगारांना व अवैध धंदे वाल्यांना मोकळे रान झाले आहे.
शहरातील मुख्य ठिकाणी कॅमेरे लावण्याची मागणी
शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिवती शहरातील मुख्य बाजारपेठ,प्रमुख रस्ते, शाळा महाविद्यालय व सर्व शासकीय कार्यालयातील परिसर येथे पोलिसांचा तिसरा डोळा म्हणजेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी नागरिक करीत आहेत जर संपूर्ण शहरात संबंधित विभागाकडून सीसीटीव्ही कॅमेरे लागले तर शहरात होणाऱ्या घरफोड्या, चौकात होणारी छोटी मोठी भांडणे, अवैध धंदे, महिला व युवतींच्या छेडछाडीच्या अश्या अनेक गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचा तिसरा डोळा समजला जाणारा सीसीटीव्ही कॅमेरा हा पोलिसांसाठी विघ्नहर्ता ठरू शकतो.
जिवती शहरातील प्रमुख चौक व मुख्य बसस्थानक भागातील कॅमेरे बंद असल्याने दुचाकी चोरी,अवैध वाहतूक,चोऱ्या,अपघात अश्या घटनांवर एकच ठिकाणी बसून नियंत्रण मिळवणे शक्य झाले होते.त्यामुळे ही यंत्रणा सध्या बंद असल्याने सुस्थितीत आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत
° संतोष इंद्राळे,जिवती



