सर्व सोयीमुक्त स्वतंत्र भाजी मार्केट उपलब्ध करून द्या : भाजी मार्केट व्यापाऱ्यांची मागणी
अस्थाई स्वरूपात बसवलेले भाजी मार्केट समस्यांचे माहेरघर : अध्यक्ष नाना घाटे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती नगर नगरपरिषद क्षेत्रात पुरेश्या, पर्याप्त व सोईयुक्त जागेचा अभाव असल्याने भाजी मार्केट, व्यापारी भाजीपाला विक्रेते, तद्वतच नागरिकांना सुद्धा अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतो हे नित्याचेच झाले आहे.
भद्रावती शहराचा मुख्य मार्ग हा विषय जेवढा गंभीर तेवढाच किंबहुना अधिक गंभीर विषय म्हणजे भाजी मार्केट हा आहे.
मुख्याधिकारीव नगराध्यक्ष यांच्या पुढ्यातील हि प्रमुख समस्या असल्याने हे दीर्घकाळाचे भिजते घोंगडे कायमच मानगुटीवर बसल्याचे दिसून येत आहे.
काही वर्षापूर्वी मूळ भाजी मार्केट हटवून या जागेवर प्रचंड खर्च करून उभारलेली इमारत आज शोभेची व गैसोयीची बाहुली बनून जीर्णतेकडे वाटचाल करीत आहे. एकही व्यापारी या गाळ्यात व्यवसाय करण्यास धजावला नसल्याचे जिवंत चित्र डोळ्यासमोर दिसून येते. या पार्श्वभूमीवर घाऊक व्यापाऱ्यांना गुंडावार यांचे खुल्या जागेवर भाडेतत्वाने जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र वाहतूक कोंडी व इतर प्रशासकीय कारणास्तव या जागेला रामराम करीत नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांचे पुढाकारातून तातडीने पावले उचलीत. भद्रनाग मंदिर शेजारी पर्यायी जागा ठोक व्यापाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली.
मात्र हि जागा सुद्धा अनेक गैरसोयीचे माहेरघर असल्याची ओरड भाजीपाला व्यापारी करू लागले आहेत. आज दिनांक ३० रोजी स्थानिक नगर परिषदेला निवेदन देत शुद्ध पाणी, शौचालय , पार्किंग व्यवस्था, आदी सह सर्व सोयी उपलब्ध होणार नाही तोपर्यंत भाजी मार्केटच्या दैनिक व वार्षिक कर दिला जाणार नाही अशी भूमिका ठोक व किरकोळ व्यापाऱ्यांनी घेतली असल्याचे सांगण्यात आले.
एक अनार, सौ बिमार या विवंचनेत असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व नवनिर्वाचित अध्यक्षापुढे प्रश्न चिन्ह उभे ठाकले आहे. व्यापारी व ग्राहक यांची सांगड घालण्यास नगर परिषद भद्रावतीकडे पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने दिवसोंदीवस समस्या तीव्र होत आहे.



