बाकडी नदीचे पुनर्जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रस्ताव मंजूर
आमदार सुमित वानखेडे यांच्या पाठपुराव्याला यश ; आर्वी तालुक्यात 13 गावाच्या शेतकऱ्यांना फायदा

चांदा ब्लास्ट
कामासाठी राज्य शासनास टाटा ट्रस्टचे सहकार्य ; 9 कोटी 59 लाख खर्चून होणार नदीचे पुनर्जीवन*
नदीतून 8 लाख 23 हजार क्युबीक मीटर गाळ काढणार
वर्धा :_ आर्वी तालुक्यातील बाकडी नदीच्या पुनर्जीवनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुर केला आहे. आमदार सुमित वानखेडे यांच्या संकल्पनेतून आणि सातत्याच्या पाठपुराव्याने मंजुर झालेल्या या कामामुळे बाकडी नदीचे जवळजवळ 13 किलोमीटरचे काम होणार आहे. तर 9 गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने काम होणार असून यामुळे तालुक्यातील जलसंधारण व शेती विकासाला मोठा हातभार लागणार आहे.
नदी व धरणांची पाणी धारण, वहन व सिंचन क्षमता वाढविण्यासाठी त्यातील गाळ काढणे व हा सुपिक गाळ शेतात पसरविण्यासाठी शेतकऱ्यांना विनामुल्य उपलब्ध करून देण्यासाठी जलसंधारण विभागाच्यावतीने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरण या दोन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत आर्वी तालुक्यातील बाकडी नदीच्या पुनर्जीवनासाठी गाळ काढणे तसेच नाला खोलीवकरण व रुंदीकरणाच्या कामास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. आ.सुमित वानखेडे यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
तालुक्यातील महादपुर, हरिशवाडा, बेलोरा, जळगाव, देव्हाडा, शिरपुर, एकलारा, माटोडा व नांदपूर या गावांच्या दरम्यान बाकडी नदीतील गाव काढण्याचे काम होणार आहे. जवळजवळ 8 लाख 23 हजार 203 क्युबीक मीटर इतका गाळ काढण्यात येणार आहे. त्यात महादपुर येथे 39 हजार 184 क्युबीक मीटर, हरिशवाडा 32 हजार 440 क्युबीक मीटर, बेलोरा 37 हजार 875 क्युबीक मीटर, जळगाव 1 लाख 17 हजार 47 क्युबीक मीटर, देव्हाडा 66 हजार 877 क्युबीक मीटर, शिरपुर 2 लाख 21 हजार 544 क्युबीक मीटर, एकलारा 1 लाख 19 हजार 80 क्युबीक मीटर, माटोडा 94 हजार 109 क्युबीक मीटर तर नांदपूर येथे 95 हजार 44 क्युबीक मीटर इतका गाळ काढण्यात येणार आहे. हा सर्व सुपिक गाळ शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.
तसेच चिस्तुर ते नांदपुर या गावांच्या दरम्यान नदीवर जवळजवळ 13 किलोमीटर क्षेत्रात खोलीकरण व रुंदीकरणाचे काम होणार आहे. या सर्व कामावर साधारणपणे 9 कोटी 59 लक्ष रुपयांचा खर्च होणार आहे. त्यात राज्य शासनाचा वाटा 4 कोटी 90 लाख तर टाटा ट्रस्ट या संस्थेचा सामाजिक दायित्व अंतर्गत वाटा 4 कोटी 69 लाख इतका आहे. कामाच्या या खर्चास देखील मंजूरी देण्यात आली आहे. नदी परिसरातील 9 गावातील शेतऱ्यांच्या 1 हजार 961 क्षेक्टर क्षेत्रावर याचा लाभ होणार आहे.
या कामामुळे नदीची पाणी वहन क्षमता वाढणार असून पावसाळ्याच्या दिवसात निर्माण होणाऱ्या पुरस्थितीवर नियंत्रण प्रस्थापित होणार आहे. परिसराताली शेतकऱ्यांना लाखो मेट्रीक टन गाळ विनामुल्य उपलब्ध होणार असल्याने त्यांच्या उत्पादकतेत वाढ होण्यास मदत होईल. तसेच सिंचनासाठी देखील नदीच्या पाण्याचा वापर होणार आहे. राज्य शासन व टाटा ट्रस्टच्या संयुक्त खर्चातून प्रकल्प मार्गी लागणार आहे. तर पुणे येथील बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशन या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे.
*नदी परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होईल – आ.सुमित वानखेडे*
बाकडी नदी आर्वी तालुक्यातील महत्वाची नदी आहे. गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने नदीची वहन आणि पाणी धारण क्षमता कमी झाली. त्यामुळे पावसाळ्यात पुराचा देखील धोका निर्माण होतो.
नदी परिसरातील शेतकऱ्यांना नदीच्या पाण्याचा तसेच सुपिक गाळाचा उपयोग व्हावा यासाठी नदीच्या पुनर्जीवनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यासाठी सातत्याने मी पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावास मान्यता दिल्याने नदी काठावरील 9 गावांच्या हजारो शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ होणार आहे.


