जिल्ह्यात पर्याप्त इंधनसाठा, नागरिकांनी पंपांवर गर्दी करून नये
जिल्हाधिकारी वान्मथी सी यांचे वाहनधारकांना आवाहन

चांदा ब्लास्ट
वर्धा :_ सद्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर जिल्ह्यात व वर्धा शहरात इंधन तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे. त्यामुळे वाहनधारक इंधन भरण्यासाठी पंपांवर गर्दी करत आहे. जिल्ह्यात पर्याप्त स्वरुपात इंधन उपलब्ध असल्याने नागरिकांनी पेट्रोलपंपांवर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले आहे.
जिल्ह्यात कार्यरत सर्वसाधारणपणे सर्वच पेट्रोल पंपावर अतिरिक्त स्वरुपामध्ये वाहनामध्ये इंधन भरण्यासाठी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे वाहनधारकांनी इंधन साठा करण्यासाठी पेट्रोलपंपावर गर्दी करु नये व कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्वच पेट्रोलपंप कंपनीच्या विक्री अधिकारी, प्रतिनिधी यांना प्रशासनामार्फत इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा असून पुरवठा सुरळीत चालु आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेऊन अनावश्यक साठा करु नये व पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी टाळावी. चुकीच्या अफवा तसेच चुकीची माहिती पसरविणाऱ्यावर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
जिल्हा प्रशासन तसेच ऑईल कंपन्या पेट्रोल व डिझेलचा साठा सुरळीत व कायम ठेवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.


