सायबर गुन्हेगारांपासून सावध राहा
सायबर पोलीस स्टेशन, वर्धा तर्फे सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढले आहे. हीच बाब लक्षात घेऊन सायबर पोलीस स्टेशन, वर्धा तर्फे स्थानिक आशीर्वाद हॉल येथे सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ‘सायबर सुरक्षा आणि जनजागृती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी सायबर तज्ज्ञांनी उपस्थितांना सायबर गुन्ह्यांचे प्रकार आणि त्यापासून बचाव करण्याचे सविस्तर मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक अनिल मेश्रामः यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, सायबर गुन्हेगार नवनवीन क्लृप्त्या लढवून लोकांची फसवणूक करत आहेत. “अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि आपले बँक तपशील कोणाशीही शेअर करू नका,” असे आवाहन त्यांनी केले. सहा. पोलीस निरीक्षक आशिष चिलांगेः यांनी तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकला. ‘ओटीपी’ (OTP) फ्रॉड, फेसबुक हॅकिंग आणि इन्व्हेस्टमेंट फ्रॉड यापासून कसे सुरक्षित राहावे, याची प्रात्यक्षिके त्यांनी सादर केली. महिला पोलीस अंमलदार मीना कौरोतीः यांनी विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान नागरिकांना खालील महत्त्वाच्या टिप्स देण्यात आल्याः कोणत्याही आमिषाला बळी पडू नका.
बँक अधिकारी बोलत असल्याचे सांगून कुणीही माहिती विचारल्यास देऊ नका. सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.



