संत गाडगे महाराज यांनी स्वच्छतेला अध्यात्माशी जोडले _ प्राचार्य साईनाथ मेश्राम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर येथील महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात संत गाडगे महाराज यांच्या जयंती उत्साहात पार पडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य साईनाथ मेश्राम उपस्थित होते. तर उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, एम सी व्ही सी विभाग प्रमुख प्रा. आरजु आगलावे, समिती प्रमुख प्रा. नंदा भोयर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सर्वप्रथम संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रा. सुधीर थिपे यांनी आपल्या मनोगतात संत गाडगे महाराज यांच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, “स्वच्छता हीच खरी सेवा आणि समाजप्रबोधन हीच खरी भक्ती” हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला. अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षण प्रसार आणि समाजातील दुर्गुणांवर प्रहार करण्याचे कार्य त्यांनी अखंडपणे केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सेवा भाव शिकावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्राचार्य साईनाथ मेश्राम यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, संत गाडगे महाराज हे केवळ संत नव्हते, तर ते समाजसुधारक आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम होते. त्यांनी स्वच्छतेला अध्यात्माशी जोडले आणि समाजात परिवर्तन घडवून आणले. आजच्या पिढीने मोबाईल व सोशल मीडियाच्या युगातही त्यांच्या विचारांचा स्वीकार करून गाव, शाळा व परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घ्यावी, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. बाळू उमरे यांनी केले. आभार प्रा. रीना लांडे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी,शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.



