बंद पडलेले गिट्टी क्रेशर सुरू करण्याची मागणी
पोटाची खळगी भरण्यासाठी करावी लागते भटकंती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील शेती व्यवसाय निसर्गाच्या पावसावर अवलंबून असल्याने येथील शेतकऱ्यांचा हिवाळ्यातच उन्हाळा होतो.बहुतांश कुटुंब मजुरीवर उदरनिर्वाह करतात त्यामुळे मजुरांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते.
पंचवीस वर्षांपूर्वी खडकी हिरापुर,पोचुगुडा, पुनागुडा या ठिकाणी गिट्टी क्रेशर उभारण्यात आले यामुळे अनेक मजुरांच्या हाताला काम मिळाले दररोज शेकडो मजुर गिट्टी फोडण्याची व विविध कामे करु लागली, खेड्यापाड्यातील लोकांना बांधकामासाठी डस्ट (चुरी ) गिट्टी स्वस्त दरात मिळु लागली थोड्याफार प्रमाणात का होईना पण पोटापाण्याचा प्रश्न सुटला असे अनेकांना वाटु लागले. गिट्टी क्रेशर हे गरीब मजुरांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले सात आठ वर्षे क्रेशर सुरू होते मात्र २००५ साली वन विभागाने ही जागा वन विभागाची असल्याचे कारण पुढे करून गिट्टी क्रेशर बंद पाडले त्यामुळे शेकडो मजुरांच्या तोंडाचा घास हिरावला गेला आजघडीला पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरांना स्थलांतर करावे लागत आहे.
जिवती तालुक्यात वन विभागाच्या आडकाठीने अनेक विकासकामे ठप्प पडली आहेत कोणताही मोठा उद्योग इथे यायला तयार नाही परिणामी तालुक्यात बेरोजगारांची फौज उभी ठाकली आहे.
शेतकऱ्यांकडे कोरडवाहू शेती असल्याने त्यातून हाती येणाऱ्या उत्पन्नावर वर्षभराचा उदरनिर्वाह भागतो, सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे शेतीची कामे लवकरच आटोपली जातात.
मजुरांना काम मिळत नसल्याने त्यांना भटकंती करावी लागते, मजुरांच्या मुलांना पोटाच्या भ्रांतीत शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे कोवळ्या वयातच आई वडिलांच्या हाताखाली छोटी मोठी कामे करून ही चिमुरडी मुले आपले बालपण घालवीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
दिवसेंदिवस पहाडावर बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे रोजगाराच्या शोधात मजुर आपल्या मुलाबाळासह स्थलांतरित होत आहेत.
विकास कामांना अडसर ठरत असलेली वन विभागाची जाचक अट रद्द करून तालुक्यात बेरोजगारांसाठी मोठा उद्योग उभारावा व विस वर्षांपासून बंद पडलेले गिट्टी क्रेशर व सिमेंट कारखान्यांना कच्चा माल पुरविणारी मातीची खाण पुर्ववत सुरू करून मजुरांना गावातच काम मिळवून देण्याची मागणी होत आहे.



