विदर्भ साहित्य संघ टिकविणे हि काळाची गरज.. डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी
इतिहास निर्माण करणारा संघ इतिहास जमा होऊ न देण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
वैदर्भीय साहित्यातला व साहित्यिकांचा आत्मबिंदू असणारी वास्तू म्हणजे उपराजधानी नागपुरातील विदर्भ साहित्य संघ होय. अनेक सारस्वत, प्रतिभावंत लेखक, कवी, रंगकर्मी, यांना साहित्य क्षेत्रात नावारूपास आणण्यात विदर्भ साहित्य संघाचा मोलाचा नव्हे तर सिंहाचा वाटा आहे. मराठी अस्मिता रुजविणे व ती वाढीस घालने, विदर्भातील अकरा हि जिल्ह्यातील वैदर्भीय बोली भाषेला, तिथल्या संस्कृतीला, उपजत कलागुणांना, नवोदिती लेखक, कवी, यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आदी महत्वपूर्ण योगदान या विदर्भ साहित्य संघाचे राहिले आहे.
मागील काही वर्षापासून साहित्याशी विशेष सोयरसुतक नसलेल्या महानुभव व्यक्तींनी विदर्भ साहित्य संघ व संघाच्या उद्देशाला हरताळ फासला आहे. आज ज्या ठिकाणी हि वास्तू आहे ती जागा प्राईम लोकेशन असल्याने व्यावसायिक हेतू ठेऊन बिल्डरांच्या घश्यात घालण्याचा प्रकार व प्रक्रिया सुरू केली आहे असा खणखणीत आरोप विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार सुपरिचित लेखक, विश्लेषक, विचारवंत, प्रतिभावंत समीक्षक, संवाद शास्त्र व माध्यमशास्त्रातील तज्ञ डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केला आहे. तद्वतच या निवडणुकी निमित्याने भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयं सेवक संघ अथवा राज्याचे मुख्यमंत्री वा केंद्रीय मंत्री यांनी अमुक तमुक लोकांनाच मतदान करा असा कांगावा करून सुज्ञ व बुद्धिजीवी मतदार वर्गात गोंधळाचे वातावरण निर्माण करीत आहे. हे सपशेल चुकीचे व दिशाभूल करणारे कृत्य असून मतदारांनी वेळीच जागे होऊन यांचा हा विपर्यास करणारा डाव हाणून पाडावा.
शिवजयंतीचे औचित्य साधून दिनांक १९ फेब्रुवारी रोजी भद्रावती येथील विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विदर्भ साहित्य संघाच्या आगामी निवडणुकीचे बिगुल फुंकले व आपला निवडणूक एजेंडा सादर करून वैदर्भीय अस्मिता व हि अस्मिता जपणारी वास्तू वाचविण्यासाठी पॅनल मधील अध्यक्ष पदा सह सर्व २२ हि उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रसिद्ध साहित्यिक व प्रशासनातील माजी अधिकारी प्रमोद भुसारी, लेखक डॉ. पंढरीनाथ ढेंगळे, लेखक व समीक्षक विनोद दिनकर देशमुख आदी प्रतिभावंत मान्यवर उपस्थित होते.



