प्रभाग क्रमांक 01 मधील दुर्दशेवर राजकारण तापले
दलित वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधांसाठी संघर्ष तीव्र

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर : घुग्घुस नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 01 अंतर्गत दलित वस्त्या शास्त्री नगर, आंबेडकर नगर आणि शिवनगर येथील नागरिक अनेक वर्षांपासून नगर परिषद कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेचा त्रास सहन करत आहेत. तुटलेल्या नाल्या, जीर्ण पाइपलाइन, खराब रस्ते आणि दुर्लक्षित सार्वजनिक स्थळांमुळे परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन अत्यंत हालाखीचे झाले आहे.
स्थानिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत गेला. नव्याने निवडून आलेले नगरसेवक तसेच नियोजन, विकास व सांस्कृतिक सभापती रवीश विनय सिंग यांना या समस्यांबाबत सातत्याने अवगत करण्यात येत होते. अखेर १२ फेब्रुवारी २०२६ रोजी रवीश सिंग यांनी संबंधित अधिकारी जुनगरे आणि कोमलवर यांना सोबत घेऊन प्रभागाची पाहणी केली.
या पाहणीदरम्यान राहुल यादववंशी, श्रीनिवास गोसकुला, बालू चिकनकर, बंटी गोरपाडे, चंद्रप्रकाश गोहोकर (ठेकेदार), चंद्रपूर येथील आर्किटेक्चर टीम तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रणयकुमार बंडी आदी उपस्थित होते.
पाहणीवेळी रवीश सिंग यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, परिसरात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी खेळ व आरोग्यविषयक सुविधा उभारण्यात याव्यात. खेळ साहित्य, योगा संरचना, व्हॉलीबॉल सेटअप, सुसज्ज खेळाचे मैदान, ज्येष्ठांसाठी नैसर्गिक वॉकिंग ट्रॅक, वृक्षारोपण करून सुंदर आणि स्वच्छ ग्राउंड विकसित करणे यासोबतच नाल्यांची साफसफाई व दुरुस्ती, पाइपलाइन समस्येचे त्वरित निराकरण आणि शास्त्री नगर येथील उद्यानाचे सुशोभीकरण करून लहान-मोठ्या कार्यक्रमांसाठी सभागृह उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
मात्र प्रश्न असा उपस्थित होतो की, या समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असताना जबाबदार अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आतापर्यंत मौन का होते? दलित वस्त्यांना खरोखरच विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले जाईल का, की ही पाहणी केवळ औपचारिकता ठरेल?
प्रभाग क्रमांक 01 मधील ही परिस्थिती प्रशासनाच्या निष्क्रियतेचे दर्शन घडवते, तसेच शहरातील काही भाग आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत असल्याची वस्तुस्थिती अधोरेखित करते. आता नागरिकांना आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा आहे.



