विश्वास आणि विकासाच्या सूत्रावर भाजपचा महापौर विराजमान – आ. किशोर जोरगेवार

चांदा ब्लास्ट
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर संपूर्ण राज्याचा विश्वास आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सर्वसमावेशक आणि गतिमान विकास होत आहे. याच विश्वासाच्या आणि विकासाच्या धर्तीवर आज चंद्रपूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन झाली असून, विश्वास आणि विकासाच्या सूत्रावर भाजपचा महापौर विराजमान झाला असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.
आमदार जोरगेवार म्हणाले की, देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिकेतही भाजपची सत्ता असणे गरजेचे होते. केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समन्वय असल्यास विकासकामांना गती मिळते, आणि त्याचा थेट फायदा नागरिकांना होतो.
चंद्रपूरच्या विकासाला प्राधान्य देत उबाठा गटातील नगरसेवकांनी व्यापक विचारातून भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आणि भाजपचा महापौर विराजमान केला. उबाठा गटाचे समर्थन शहराच्या भवितव्यासाठी घेतलेला जबाबदार निर्णय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नव्या सत्तेच्या माध्यमातून चंद्रपूर शहराचा पायाभूत विकास, नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते आणि रोजगारनिर्मिती यांसारख्या विषयांना प्राधान्य दिले जाईल. चंद्रपूरला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी ही महापालिका कटिबद्ध राहील, असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.


